शुभेच्छा : दिवाळी २०११

शुभेच्छा : दिवाळी २०११

तमा नाही अंधाराची
एक पणती लावूदे;
फार वाटते एकटे
हात हातात राहूदे.

इवल्याशा पणतीने
दूर पळतो अंधार;
लढणा-या माणसाला
देते शुभेच्छा आधार.

डहाकेंची चित्रलिपी समजून घेताना... : विश्राम गुप्ते




‘चित्रलिपी’ एकाच वेळी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक 
जीवनावरचं खालच्या पट्टीतला सूर लावणारं समूहगीत आहे. डहाक्यांच्या 
सामाजिक पिंडाशी आणि त्यांच्या देवदत्त प्रवृत्तीशी ही रचना मेळ खाणारी आहे. 
डहाक्यांचा गेल्या चाळीसेक वर्षाचा वाङ्मयीन प्रवास तल्लख बुद्धीने सुरू आहेच, 
पण त्याचा सूरही शांत आहे. डहाक्यांच्या बाबतीत हे नोंदवण्यासारखं आहे.
वसंत आबाजी डहाके यांच्या ‘चित्रलिपी’ या कविता संग्रहाला यंदाचा साहित्य 
अकादमी पुरस्कार घोषित झाला. परवा डहाके गोव्यात असताना त्यांनी 
एकूणच मराठी कवितेवर जे बीजभाषण केलं, त्यातली त्यांची काव्यार्थाला 
प्राधान्य देणारी आणि सत्य हेच निक्षून बोलणारी भूमिका कुठल्याही तोतया 
नसलेल्या कवीला आवडून जाईल अशीच आहे.
सुदैवाने नवी किंवा नवोत्तर जाणीव मराठी वाड्मयीन पर्यावरणाला नवी नाही. 
मर्ढेकरांपासून जर या जाणिवेचा प्रवास सुरू झाला असं मानलं तर तिला 
व्यामिश्रतेचे धुमारे फुटले ते दिलीप पुरुषोत्तम चित्रे, अरुण कोलटकर, भालचंद्र 
नेमाडे, मनोहर ओक आदी ‘अँग्री यंगमेन’च्या भन्नाट कवितांमुळेच.
डहाकेंची कविता तशी ‘अँग्री’ नाही. ती ढसाळांच्या कवितेसारखी मूर्तिभंजक 
नाही. ग्रेसच्या कवितेसारखी गूढ नाही. बोरकर, पाडगावकर, बापटांच्या 
कवितेसारखी सौंदर्यवादी नाही, विंदांच्या किंवा कुसुमाग्रजांच्या कवितेसारखी 
आदर्शाचा ध्यास घेणारी नाही. मग डहाकेंची कविता नेमकी कशी? साहित्य 
अकादमी पुरस्कारास पात्र ठरल्यानंतर त्यांच्या ‘चित्रलिपी’चं त्रोटक मूल्यांकन 
करू या.
‘चित्रलिपी’मध्ये बखर या पहिल्याच कवितेला डहाकेंचा जाहीरनामा म्हणता 
येईल. शब्दांची मलमपट्टी नाकारून, यमकप्रासांचा रुणुझुणु नाद भिरकावून, 
भावनाविचारांची तकलुपी कच्ची घरं बांधण्याच्या रोमॅँटिक प्रवृत्तीला झुगारून 
डहाक्यांची ‘चित्रलिपी’ ठिक-या उडालेल्या मानवी अस्तित्वावर मर्मभेदी भाष्य 
करते. त्यांच्याच भाषेत, ‘जाड्या भरड्या गोणपाटासारखं.’
डहाके चाळीसेक वर्षांपूर्वी जोरात असलेल्या ‘लिटिल मॅगझिन’ चळवळीचे 
(तुतारी न फुंकणारे) एक ‘शूर शिपाई.’ प्रस्थापित अभिरुचीला शरण गेलेली 
आणि जाहीर कोडकौतुकाने सुस्त झालेली तुंदीलतनू संवेदनशीलता डहाकेंच्या 
पिढीतल्या किमान दोन डझन कवींनी नाकारली आणि कवितेची नवी पायवाट 
खोदली. साहित्यात नवं बांधकाम करण्यासाठी जिगर लागते. डहाक्यांनी  ती 
दाखवली.
डहाक्यांची एकूणच कविता, पण प्रामुख्याने त्यांची ‘चित्रलिपी’ समजावून 
घेताना डहाक्यांचा प्रस्थापित संवेदनशीलतेविरुद्धचा हा पवित्रा दुर्लक्षून चालणार 
नाही. प्रस्थापितता कायम टिकून राहण्यास उतावळी असते. विस्थापितता 
तिला हळूहळू धक्के देत, तिचं आसन डळमळीत करते. डहाक्यांच्या पिढीने हे 
धक्के देण्याचं पवित्र काम कुठलेही हिशेब मनात न ठेवता समरसून केलं.आज 
मराठीत लोकप्रिय, कौतुकोत्सुक, मंचप्रिय ‘रुणुझुणु नाद’ करणा-या काव्याला 
पर्याय मिळाला आहे. या पर्यायी वाड्मयीन अभिरुचीचा एक झेंडा 
डहाक्यांसारख्या वय आणि वृत्तीने प्रगल्भ कवींच्या खांद्यावर आहे. गंमत 
म्हणजे डहाक्यांच्या या नवकवितेचा इमला प्राय: साध्यासुध्या म्हणजे गद्य 
आणि सुगम शब्दांवर बांधलेला आहे. तरीही डहाक्यांची कविता अंतमुर्ख आहे, 
चिंतनशील आहे, व्याकूळ आहे, ऋजू आहे आणि तरीसुद्धा भेदक आहे. हे 
रसायन अनपेक्षित आहे. पुरस्कारप्राप्त ‘चित्रलिपी’ वाचताना भोवतालच्या 
सामाजिक, सांस्कृतिक चित्रांच्या सरळसोट नव्हे; तर वेड्यावाकड्या, गुळगुळीत 
नव्हे; तर खडबडीत, गोडगोड नव्हे; तर कडू-आंबट अशा तापदायक प्रतिमांचा 
छळवाद सुरू होतो. चित्रलिपीत समकालीन प्रतिमांचा एकच गजबजाट आहे. 
‘चित्रलिपी’ एकविसाव्या शतकाचं विषण्ण वास्तव आहे.
डहाक्यांच्या ‘चित्रलिपी’त प्रतिमांची अफरातफर होत नाही. म्हणजे जगणं एक 
आणि लिहिणं दुसरंच, असं काही ते करत नाहीत. जगणं, सगळंच्या सगळं 
कवितेत ओतणं हे आधुनिक संवेदनशीलतेचं व्यवच्छेदक लक्षण. डहाकेंमधला 
कवी आणि माणूस यांची बेमालूम सरमिसळ होते.‘चित्रलिपी’ एकाच वेळी 
राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जीवनावरचं खालच्या 
पट्टीतला सूर लावणारं समूहगीत आहे. डहाक्यांच्या सामाजिक पिंडाशी आणि 
त्यांच्या देवदत्त प्रवृत्तीशी ही रचना मेळ खाणारी आहे. डहाक्यांचा गेल्या 
चाळीसेक वर्षांचा वाड्मयीन प्रवास तल्लख बुद्धीने सुरू आहेच, पण त्याचा 
सूरही शांत आहे. डहाक्यांच्या बाबतीत हे नोंदवण्यासारखं आहे.अबोध 
व्याकुळता, विश्वाच्या पसा-यात मानवाला आलेलं पोरकेपण, त्याचं तुटलंपण, 
माणसांतला विसंवाद, आप-पर भाव, त्यातून येणारा निर्मम व्यवहार, 
एकाकीपण, व्यक्ती-समष्टीचं द्वंद्व हे अस्तित्ववादी तत्त्वचिंतनाचे मुख्य खांब. 
डहाकेंचं गद्य लिखाण या तत्त्वचिंतनाचा हुंकार आहे. त्यांची कवितासुद्धा तशीच 
आहे.


मी कोंडून ठेवतोय झाडाचं गाणं
माझ्या आत गच्च;
अलीकडे, सांप्रत,
आजकाल, सद्य:स्थितीत.


‘झाडाचं गाणं’ या त्यांच्या कवितेच्या या शेवटल्या ओळीत त्यांनी चार 
निरनिराळे शब्द वापरून एकच काळ (चालू काळ) अधोरेखित केलेला दिसतो. 
हे सकारण आहे. डहाक्यांना चालू क्षण कवितेत धरायचा आहे. किंबहुना याच 
एका क्षणज्योतीवर त्यांचं त्राटक सुरू आहे. डहाक्यांच्या कवितेतल्या पोपटाचा 
प्राण समकालीनतेमध्ये वसतो. वसंत आबाजी डहाके नावाच्या राजपुत्राला हे 
ठाऊक आहे.विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर आणि वसंत बापट या आनंद 
त्रयीने महाराष्ट्रात एकेकाळी हंगामा करून टाकला होता. या त्रयीनंतर उगवली 
ती चित्रे, कोलटकर, नेमाडे नावाची त्रयी. आधुनिक मराठीचं हे तापत्रय. या 
तापत्रयाशी डहाक्यांचं जैविक नातं. डहाके या तापत्रयी काव्यजाणिवेचे वारसदार 
आहेत. ‘चित्रलिपी’ याच वेदनायुक्त संवेदनशीलतेचा परिस्थितीजन्य 
पुरावा.साठोत्तरीच्या पिढीत मराठीत आध्यात्मिक, आधिभौतिक आणि 
आधिदैविक अशा तीन प्रकारच्या पीडांना अभिव्यक्ती मिळत गेली. डहाक्यांची 
चित्रलिपी या तिन्ही पीडांना समकालीन सामाजिक परिप्रेक्ष्यामधून जोखून 
बघते. तिची चिकित्सा करते. हे करताना तिचा पवित्रा प्राय: हताश भाष्याचा 
असतो. तो घोषणाबाजी करणा-या  कवीचा नसतो. डहाक्यांच्या बाबतीत ही 
दुसरी नोंदवण्यासारखी गोष्ट.


कवीचे डोळे उघडे असतात तोवरच
त्याच्या चेह-यावर वाचता येतात
जगण्याच्या प्रतिमा.
ते मिटले की काहीच उरत नाही
हजारो योजनांच्या भणभण प्रदेशात.


 ‘जगण्याच्या प्रतिमा’ या कवितेतल्या ओळींमधला तो भणभण प्रदेश. हीच 
जगड्व्याळ व्याकुळता. कवीला कायम छळणारी, वहाणेतल्या खडय़ासारखी 
टोचणारी, उद्विग्न करणारी. कवी किंवा कविता स्वयंभू नाहीत, असं सुचवताना 
डहाके याच कवितेत सुरुवातीला केवळ शब्दांनी झाडाचं पानसुद्धा हलत नाही, 
ही सार्थ खंत व्यक्त करतात.
शब्दांना अवास्तव महत्त्व देणारी आनंदमिमांसा करण्यात डहाके असमर्थ ठरले. 
ही असमर्थता त्याच्या डीएनएमध्येच वसते. त्यांच्या रक्तपेशीचा भाग म्हणून. 
रोमॅँटिक कवींच्या डीएनएमध्ये उसना उत्साह दुथडी भरून वाहात होता, आहे 
आणि असेल. डहाक्यांची जातकुळी वेगळी.डहाक्यांची ही काव्यसाधना निर्वात 
पोकळीत घडली नाही. तिचे सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय संदर्भ 
आपल्या परिचयाचे आहेत. अशा या व्यामिश्र, अमानुष, यांत्रिक आणि अनात्म 
समकालीनतेला षड्ड ठोकून सडपातळ अंगयष्टीचे डहाके आव्हान देतात. 
समकालीनतेच्या चेटकिणीच्या झिंज्या ते ओढतात, म्हणून ‘चित्रलिपी’ शूर 
कविता ठरते.‘चित्रलिपी’ लिहिणारे डहाके हे उत्तम चित्रकारसुद्धा आहेत. 
किंबहुना त्यांच्या कविता या चार्कोलमधल्या रेखाचित्रासारख्या थेट आणि 
जलरंगासारख्या पारदर्शक होऊन उमटतात.


मी उतरायचो
वाघिणीच्या डब्याचीच केबिन असलेल्या लहानखु-या स्टेशनच्या
मोकळ्या प्लॅटफार्मवर
आणि शोधायचो ओळखीचे बैल.
सावलीत विसावलेले, कडबा चघळीत असलेले.
ते मला ओळखत असत की नाही कोणास ठाऊक
पाठीवर हात ठेवला की थरथर तेवढी जाणवायची
आणि डोळ्यात नेमकं काय आहे, याचाथांग नाही लागायचा.


अशी चित्रमय अभिव्यक्ती असलेले डहाके हे पहिले चित्रकारच, मग कवी. 
मराठीतले काही दादा कवी चित्रकार होतेच. दिलीप पुरुषोत्तम चित्रे उत्तम 
चित्रकार होते, अरुण कोलटकरांनासुद्धा चित्रं काढणं आवडे, डहाके असे चित्रकार 
आहेत. तसेच ते कवी, कादंबरीकार, समीक्षक, वाङ्मयाचे इतिहासकारसुद्धा 
आहेत.जगणं, प्रेम करणं आणि मरणं या तीनच गोष्टी माणसासाठी सर्वाधिक 
महत्त्वाच्या; पण कवी या तीन गोष्टी भयंकर जीव ओतून करतो. जगता जगता 
तो प्रेम करतो आणि प्रेम करता करता तो मरण आठवतो. चित्र्यांच्या कवितेत 
मरण आहे. कोलटकारांच्या कवितेत निर्मम पार्थिवता आहे. डहाक्यांच्या 
कथनात्मक काव्यात मरणाची अथांग व्याकुळता आहे. कशी ती
‘चित्रलिपी’तल्याच ‘टाटा मेमोरिअल हॉस्पिटलमधून वावरताना’ 
या कवितेत बघा : 


आता डोक्यात चंद्र घेऊन उभं राहायचं
विठ्ठलासारखं, कमरेवर हात ठेवून.
नाही तर विष्णूसारखं पडून राहायचं
पाण्यावर तरंगत.
चांदणं पाझरत राहील आत आत
सगळ्या नळ्यांमधून सावकाश.
आपलं शरीर इथं सापडतं,
संतांना विठ्ठल सापडल्यासारखं.


.डहाक्यांचं मर्त्यतेचं भान असं पौराणिक, ऐतिहासिक आणि आधुनिक 
प्रतिमांद्वारे चितारलं गेलं. कॅन्सर वार्ड हा हरेक माणसासाठी हादरवून टाकणारा 
अनुभव. डहाक्यांसारखा कवी या भयाचं सोनं करतो. चांदणं, नळय़ा, विठ्ठलाचं 
सापडणं, संत या प्रतिमा कवीच्या चित्रमय आस्थेचा भाग होतात. 
‘चित्रलिपी’तली प्रत्येक कविता अगम्य मानवी अस्तित्वाला चिमटीत धरते 
तरीही ती ढळढळीत जगण्याबद्दल आहे. हे जगणं राजकीय जाणिवेला नाकारून 
घडूच शकत नाही. डहाक्यांच्या ब्रह्मांडात हे चालू जगणं अवघ्या जीवन 
जाणिवेला कवटाळणारं आहे. तरीही रुढार्थाने डहाक्यांना कोणीही ‘सामाजिक 
जाणिवेचा कवी’ हे बिरुद लावू शकणार नाही.
‘चित्रलिपी’ ही सामाजिक कविता नाही, मात्र सामाजिक पर्यावरणात ती घडते. 
तिची स्पंदनं आणि तिचे व्हायब्रेशन्स कायम विस्तारत जातात. व्यक्तीच्या 
नेणिवेसापासून सुरू होऊन समाजाला, अखेरीस ब्रह्मांडाला कवटाळतात. 
‘चित्रलिपी’चं हेच वैशिष्ट्य.
डहाके मूलत: प्रखर अस्तित्ववादी कवी, म्हणून त्यांना शब्दांचा वेडाभाबडा 
उत्सव साजरा करता येत नाही. कवितेला ‘परफॉर्मिग आर्ट’ करणा-या कवींच्या 
घोळक्यात डहाके कदाचित विरूप भासतील. हे विरूपपण जोपासणं म्हणजेच 
काव्यसाधना. नव्या कवींनी डहाक्यांकडून हिंमत घ्यायची ती या 
बाबतीत.सत्याशी समझोता करणारी, सत्तेशी संधिसाधू लगट करणारी, 
कवितेकडे करिअर म्हणून बघणारी स्मार्ट दृष्टी डहाक्यांना नाही. अवघं आयुष्य 
कवितेला अर्ध्यासारखं दान दिलेल्या या शांत, पण प्रगल्भ कवीचा शब्द 
साक्षात्कार केवळ भेदक आहे.


शब्द फोडलाकी
त्यातून अर्थाऐवजी
एखादा कीटक निघतो,
असे झाले.’


चित्रलिपीचा मात्र प्रत्येक शब्दन् शब्द अर्थाने भारीत आहे. कारण तो थॉमस 
मान म्हणतो तशा ‘सच्च्या हताशे’तून, व्याकुळतेतून, जगण्याबद्दलच्या असीम 
गलबल्यातून व्यक्त झालेला आहे.कवी काय काम करतो? असं दिलीप चित्र्यांनी 
विचारलं होतं. त्याचं उत्तर खूप मोठं आहे. डहाक्यांच्या ‘चित्रलिपी’बद्दल 
बोलताना असं म्हणावंसं वाटतं की, चिरंतन दु:खाला सामोरा जातो. त्या 
दु:खाशी तादात्म्य पावतो.दु:खाची अदृश्य रेषाआता प्रकट झाली आहे माझ्या 
हातावर.आणि हळूहळू पुसट होत नाहीशा होताहेतभाग्यरेषा, आयुष्यरेषा.
‘चित्रलिपी’ अशा व्याकुळतेच्या करड्या कॅनव्हासवर उमटते. या लिपीच्या 
रेषान् रेषा काळजाचा ठाव घेतात. जाणीव समृद्ध करतात. नव्या जाणिवेने 
वाचक उत्कट होतो.
ही जाणीव मराठीतल्या नव्या संवेदनशीलतेची नांदी आहे. साहित्य अकादमी 
पुस्काराने या नवजाणिवेला राजमान्यता मिळाली. एकदा ती मिळाली की 
लोकमान्यता मिळतेच, असं काही म्हणता येईल का?


सुगी


काळजाला घरं पाडणारा सुगीचा काळ
आलेला आहे.
अमाप पीक उगवलेलं आहे
भ्रष्ट इच्छांचं.


मी जड पावलांनी चालत जातो
वर्तमानाच्या अंधारलेल्या गल्लीबोळातून.
मी कमावलेलं नाही
माझं कातडं.
माझ्या खिशात नाही
मिठ्ठास भाषा
भोवतीच्या व्याकरणानुसार वागणारी.
माझे रागद्वेष विझून जाणा-या
वातीसारखे आहेत
हलक्या झुळुकेनं.
रस्त्यावर टाकून दिलेल्या मुलासारखा
पडलेला आहे सगळा देश.
त्याच्या आसपास विखुरलेली आहेत किडलेली सहानुभूतीची कणसं.


माझ्या मेंदूपर्यंत पोहोचत नाही
माझ्या बोटांचं बधिर होणं.
लवकरच मागावर असलेला काळ
लागवड करील माझ्या मस्तकात
क्षुल्लक आकांक्षांची.
मुळंच खाऊन टाकणारा बहर येईल
माझ्याही असण्याला.


-वसंत आबाजी डहाके


‘चित्रलिपी’ (लोकवाङ्मय गृह )


(‘प्रहार’वरून साभार) 

कोसळलेल्या शतकाचा कवी : मुकुंद कुळे

एका अर्थाने वसंत आबाजी डहाके पुराणपुरुषच तर 
आहेत. सरलेल्या विसाव्या शतकाचा वेध घेणारे. 
‘योगभ्रष्ट’, ‘शुभवर्तमान’, ‘शुन:शेप’ आणि आता पुरस्कार 
मिळालेला ‘चित्रलिपी..’ या कवितासंग्रहांत त्यांनी 
सरलेल्या शतकांतील घटनांचाच वेध घेतलेला आहे.
काळाचे घाव पचवून, नंतर रिचवून, जो आपल्या 
कलाकृतीतून त्या काळाचंच रूप त्यातल्या जमेच्या 
आणि उणिवेच्या बाजूंसकट ठळकपणे अधोरेखित करतो, 
तो खरा कलावंत. कारण केवळ कल्पनारंजन हे 
कुठल्याही जातिवंत कलेचं बलस्थान असूच शकत नाही. 
या निकषावर ज्येष्ठ कवी वसंत आबाजी डहाके यांची 
कविता घासून पाहिली, तर ती जितकी घासावी तितकी 
अधिक झळाळून उठते. कारण वसंत आबाजी डहाके 
यांची कविता मनोरंजनासाठी किंवा मनोविनोदनासाठी 
कधीच नव्हती. उलट कुसुमाग्रज आपल्या कवितेविषयी 
म्हणायचे त्याप्रमाणे ‘जात्याच रूक्ष या, एकच त्या 
आकांक्षा; तव आंतर अग्नी क्षणभर तरी फुलवावा’ या 
थाटाच्याच डहाकेंच्या कविता होत्या आणि आहेत. मग 
ती कविता त्यांच्या पहिल्या ‘योगभ्रष्ट’ कवितासंग्रहातली 
असो किंवा नुकताच त्यांच्या ज्या कवितासंग्रहाला 
साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला त्या ‘चित्रलिपी’ 
संग्रहातली कविता असो; ती वाचून वाचणारा अस्वस्थ, 
सैरभैर होतो. इतका त्यांच्या कवितेतला अनुभव थेट, 
पण दाहक असतो. अर्थात, आपल्याला छळणारा अनुभव 
ते आक्रमक, बोच-या  किंवा तिरक्या शैलीत कधीच 
मांडत नाहीत. उलट मनात जे खदखदतंय ते शांतपणे 
मित्राच्या खांद्यावर हात ठेवून विश्वासाने त्याला काही 
सांगावं, तशी ते कविता लिहितात. ही विश्वासार्हता किंवा 
शांतपणा हाच वसंत आबाजी डहाके यांचा स्थायीभाव 
आहे. जे वसंत आबाजी डहाके यांना ओळखतात, किंवा 
जे त्यांना भेटलेत, त्यांना हे नक्की पटेल. कारण वसंत 
आबाजी डहाकेंना कधीही भेटलात आणि कोणताही प्रसंग 
असला, तरी त्यांची बोलण्याची संथ आणि शांत लय 
कधीही बिघडत नाही. एखाद्या व्रतस्थ योग्यासारखेच 
तपस्वी भाव त्यांच्या चेह-यावर असतात. 
पुराणपुरुषासारखे. खूप काही पाहिलंय, सोसलंय हे 
सांगणारे...आणि एका अर्थाने वसंत आबाजी डहाके 
पुराणपुरुषच तर आहेत. सरलेल्या विसाव्या शतकाचा वेध 
घेणारे. ‘योगभ्रष्ट’, ‘शुभवर्तमान’, ‘शुन:शेप’ आणि आता 
पुरस्कार मिळालेला ‘चित्रलिपी..’ या सर्व कवितासंग्रहांत 
त्यांनी सरलेल्या शतकांतील घटनांचाच वेध घेतलेला 
आहे. मात्र त्यांनी इतिहासजमा झालेल्या विसाव्या 
शतकासाठी ‘सरलेलं शतक’ ऐवजी हेतुपुरस्सर 
‘कोसळणारे शतक’ असाच शब्दप्रयोग केला आहे. कारण 
त्यांच्या दृष्टीने विसाव्या शतकात सामाजिक, राजकीय, 
सांस्कृतिक, धार्मिक अशा सर्वच क्षेत्रांत घडलेल्या 
महत्त्वाच्या घटना या उन्नतीऐवजी विश्वाला एकप्रकारे 
अधोगतीकडेच नेणा-या होत्या आणि या सरलेल्या 
शतकावर त्यांनी आपल्या प्रत्येक संग्रहातून किंबहुना 
प्रत्येक कवितेतून यथोचित भाष्य केले आहे. आपल्या 
कवितेच्या माध्यमातून त्यांनी समाजातील विविध 
वृत्ती-प्रवृत्तींवर केलेलं भाष्य किती मोलाचं होतं, हेच जणू 
त्यांना मिळालेल्या साहित्य अकादमीच्या पुरस्कारामुळे 
सिद्ध झालं आहे. वास्तविक वसंत आबाजी डहाके गेली 
चाळीस वर्ष प्रचंड ताकदीची कविता लिहीत आहेत. 
त्यामुळे साहित्य अकादमीसारखा मानाचा पुरस्कार 
त्यांना मिळायला अंमळ उशीरच झाला. पण पुरस्काराचा 
सोस बाळगणा-यांतले डहाके नाहीत. म्हणूनच गेल्या 
तब्बल चाळीस वर्षांत ‘योगभ्रष्ट’, ‘शुभवर्तमान’, 
‘शुन:शेप’ आणि ‘चित्रलिपी’ असे त्यांचे फक्त चारच 
कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. कुणाकडे काही 
मागायला जावं किंवा कुणाकडे आपल्यासाठी शब्द 
टाकावा, ही डहाकेंची आणि त्यांच्या कवितेची प्रवृत्तीच 
नाही. त्यामुळे त्यांचं आजवर खूप नुकसानही झालं आहे. 
पण त्याविषयी त्यांची काही तक्रारही नाही. किंबहुना 
म्हणूनच आपण कोसळणा-या  शतकाचं गीत गायला 
मोकळे आहोत, असं ते आजही अभिमानाने सांगतात. 


वसंत आबाजी डहाकेंची पहिली दीर्घकविता ‘योगभ्रष्ट’ ही 
१९६६च्या ‘सत्यकथा’च्या मेच्या अंकात प्रसिद्ध झाली 
होती. त्यानंतर ते जणू ‘सत्यकथा’ आणि पर्यायाने 
‘मौज’चेच कवी होऊन गेले. पण मौजेचा शिक्का 
बसल्यामुळेच, १९६०च्या आसपास उदयाला आलेल्या लघु 
अनियतकालिकांच्या चळवळीतील कवींनी आणि त्यांना 
उचलून धरणा-या  समीक्षकांनी वसंत आबाजी डहाकेंच्या 
कवितेकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले. वास्तविक डहाके 
यांची कविता पहिल्यापासून लघु अनियतकालिकांत 
प्रसिद्ध होणा-या कवितेशीच नातं सांगणारी होती. 
किंबहुना त्यापेक्षा सरसच होती. पण केवळ त्यांच्या 
कविता मौजेत प्रसिद्ध झाल्यामुळे लघु 
अनियतकालिकांतील तत्कालीन कविमंडळाने डहाकेंची 
कविता अलक्षितच ठेवली. परंतु जे अस्सल असतं, ते 
कधीच काळवंडत नाही. त्यानुसारच नव्वदोत्तरीत उदयाला 
आलेल्या कवींच्या पिढीने वसंत आबाजी डहाके यांनाच 
आपला  आदर्श मानला. यासाठी डहाके स्वत: कधीच 
कुणाला काही सांगायला गेले नाहीत. पण वाट पुसत 
आलेल्या कुणाला त्यांनी माघारीही पाठवलं नाही. 
त्यामुळेच आजची कवींची तरुणपिढी वसंत आबाजी 
डहाके आणि त्यांच्या कवितेवर भरभरून प्रेम करते आहे. 
चंद्रपूर, अमरावती, मुंबई आणि आता आयुष्याच्या 
उत्तरार्धात वसंत आबाजी डहाके व प्रभा गणोरकर या 
जोडप्याने पुन्हा एकदा आपल्या गावी म्हणजे 
अमरावतीला तळ ठोकला आहे. आयुष्याच्या सुरुवातीला 
काही स्थलांतरं डहाकेंना नाईलाजास्तव परिस्थितीअभावी 
करावी लागली. या प्रत्येक स्थलांतराची हुरहूर त्यांच्या 
कवितांमधून अधेमधे भेटीला येत राहिली. मात्र पुन्हा 
अमरावतीला परतण्याचा निर्णय हा त्यांचा आणि 
प्रभाताईंचा दोघांचा होता. मात्र डहाके अमरावतीला गेले 
म्हणून स्वस्थ बसले असं झालं नाही. उलट 
अमरावतीसारख्या छोट्या शहरात वसूनही संपूर्ण महाराष्ट्र 
हेच त्यांचं मोठं घर झालं आहे. कारण वास्तव्य कुठे 
आहे, हे त्यांच्या लेखी कधीच महत्त्वाचं नव्हतं. उलट 
कुठेही राहिलो, कुठल्याही समाजवास्तवात राहिलो, तरी 
समाजात घडणा-या  घटनांची स्पंदनं टिपणारं मन तेवढं 
जागृत असलं पाहिजे, एवढीच त्यांची प्रत्येक वेळी 
माफक इच्छा असायची. आणि तसं त्यांचं मन जागरूक, 
संवेदनशील राहिलं; त्यामुळेच तर ते कोसळत्या शतकाचे 
साक्षीदार होऊन लिहू शकले-मी जेव्हा मागं वळून 
पाहतोया मावळत चाललेल्या शतकाकडे.तेव्हा 
बाजारबुणग्या लोकांचे दंगे पचवूनसुस्त पडलेल्या 
राजवटींची वेटोळी दिसतात;विध्वंसाची एकसारखी पिकं 
काढून नापीक केलेली पृथ्वी दिसते..

(‘प्रहार’वरून साभार) 

डहाकेंची चित्रलिपी



वसंत आबाजी डहाकेंना काही वर्षांपूर्वी वासंती गाडगीळ 
स्मृती पुरस्कार मिळाला होता तेव्हा ते म्हणाले होते, 
अनेक पुरस्कार समित्यांवर काम करता करता 
आपल्यासाठीही एखादा पुरस्कार असेल 
हे मी विसरूनच गेलो होतो. 
कधीही जाहीरपणे कुणाविषयी नाराजी व्यक्त न करणा-या 
डहाकेसरांच्या मनातली सल अशी अवचित बाहेर आली 
होती. त्यांना मिळालेला तो पुरस्कार मुळीच छोटा 
नव्हता. त्यानंतर त्यांच्या 'मराठी साहित्य : इतिहास 
आणि संस्कृती' या समीक्षा ग्रंथाला महाराष्ट्र फाउंडेशनचा 
पुरस्कार मिळाला आणि आता 'चित्रलिपी' या 
काव्यसंग्रहाला यंदाचा साहित्य अकादमी हा राष्ट्रीय 
स्तरावरचा मोठा पुरस्कार मिळाल्यावर तर सगळी देणी 
सव्याज फिटून गेल्यासारखं झालंय. यात दोन 
वर्षांपूर्वीसाहित्य संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या 
निमित्तानं झालेला मनस्तापही धुतला गेलाय. 
अध्यापनासाठी मधली बरीच वर्षं मुंबईत काढल्यानंतर 
'तुझं शहर मला आवडलेलं नाही...माझा श्वास घुसमटतो 
तुझ्या उंच इमारतींमध्ये' म्हणत ते अमरावतीला जाऊन 
बसले आहेत. मालटेकडी या आपल्या गावातल्या 
परिसराच्या आठवणी, त्यानिमित्तानं होणारं चिंतन लिहून 
काढण्यात रमले आहेत. तसे सदैव निरीच्छ वाटणारे 
डहाके सर आता अधिक मोकळे निवांत होत असतानाच 
हा पुरस्कार जाहीर झालाय. या पुरस्काराने जबाबदारी 
वगैरे काही वाढलेली नाही, उलट आधीच त्यांनी 
जबाबदारीने बरंच काही करून ठेवलंय त्याची कुणीतरी 
अधिक जबाबदारीने दखल घेण्याचीच गरज आहे. कविता 
तर पहिल्यापासून होत्याच, चित्रकलाही होती पण 
प्राध्यापकी शिस्तीनं त्यांनी केलेली समीक्षा, वाङ्मय 
कोशाचं काम, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 
फोटोबायोग्राफीची नेटकी संपादणी आणि साहित्याला 
ऐतिहासिक काळाच्या पटलावर ठेवून संस्कृतीच्या वाहत्या 
प्रवाहात साक्षेपी दृष्टीनं केलेला त्याचा तपास यांतून 
त्यांची सर्जकता अनेक वाटांनी प्रवाही होत राहिली. 
बाहत्तर साली वसंत आबाजी डहाके यांचा 'योगभ्रष्ट' 
नावाचा कविता संग्रह बाहेर आला तेव्हा अनेक अस्वस्थ 
तरुण त्याच्या प्रभावाखाली होते. विशेषत: 'योगभ्रष्ट' या 
दीर्घकवितेच्या तर अधिकच. कॉलेज मधल्या मुलांना या 
कवितेवर रंगमंचीय आविष्कार सादर केले. सत्तर 
सालातला ठसठसता असंतोष, सामाजिक स्तरावर 
जाणवणारी आणि तरुणांच्या व्यक्तिगत जीवनजाणीवेत 
पसरलेली निराशा, उद्वेग याचा प्रखर आणि असहाय उद्गार 
त्यांना डहाकेंच्या कवितेत सापडला. सत्तरच्या दशकातले 
अस्तित्ववादी साहित्यिक काफ्का, काम्यू, सार्त्रच्या प्रेमात 
होते. स्वत: डहाके काफ्काच्या खूप प्रभावाखाली 
असल्याचं त्यांच्या कविता आणि कादंब-यांमध्येही स्पष्ट 
दिसायचं पण हा प्रभाव लपवण्याची खटपट डहाकेंनी 
कधी केली नाही. उलट हा प्रभाव इतका रिचवला की 
काफ्काने पेरलेली जीवनजाणीव, त्यातली परात्मता याचा 
त्यांनी भारतीय समाजव्यवस्थेत जगताना अचूक 
अन्वयार्थ लावला. 
डहाकेंच्या कवितांच्या गद्यप्राय ओळी अंतत: आपल्यावर 
एक स्पष्ट परिणाम करत जातात. या ओळींतून तुम्ही 
कविताच नाहिशी करू बघता आहात काय, असा प्रश्न 
एका मुलाखतकर्त्याने त्यांना केला होता तेव्हा ते म्हणाले 
होते, 'मला कविता नव्हे तर कवितेतली गेयता नाहिशी 
करायची आहे. कविता, कथा, ललित निबंध यांच्यातला 
भेद नाहिसा व्हावा आणि त्यांच्या रचनेबाबत संभ्रम 
निर्माण व्हावा असं मला करायचं आहे.' 
आपली कविता रोजच्या जगण्याच्या पातळीवर आणू 
बघणा-या सर्जकाच्या मनातली ही  चित्रलिपी खूप सोपी 
आणि खूप गहन आहे. 
- जयंत पवार 
(म.टा.वरून साभार)

चित्रलिपी : अभिनंदन

__________________________________________

वसंत आबाजी डहाके यांच्या ‘चित्रलिपी’ या कवितासंग्रहाला 
साहित्य अकादमीचा पुरस्कार घोषित झाला.त्याबद्दल 
डहाके सरांचे मन:पूर्वक अभिनंदन.
या निमित्ताने सरांवरील दोन लेख आणि 
सरांची एक कविता येथे देत आहोत.
________________________________________________


अनुबंध-युगमानसाचा कवी : प्रा. वसंत डहाके


कवितेच्या क्षेत्रात नव्या पाऊलखुणा उमटविण्यात डहाके यांच्या कवितेने महत्त्वपूर्ण वाटा उचललेला आहे. त्यांच्या जाणिवेचा अवकाश अत्यंत व्यापक आहे. गतिमान प्रवाहाला कवेत घेण्याचे सामर्थ्य त्यांच्या भाषाशैलीत आहेत.आत्मभान आणि समाजभान यांचा समतोल त्यांच्या व्यक्तिमत्त्वात असल्यामुळे त्यांच्यातील सर्जनशील प्रतिभेचा आणि त्यांच्या समीक्षा विचारातील प्रज्ञेचा कुठेही विसंवाद आढळत नाही...

कोसळत्या शतकाचा कवी



१९७० नंतरच्या समकालीन समाजवास्तवावर भाष्य करणारी कविता लिहिणारे प्रभावी कवी, कादंबरीकार, समीक्षक आणि विचारवंत म्हणून वसंत आबाजी डहाके यांनी मराठी साहित्यविश्‍वावर तेजस्वी मुद्रा उमटविली आहे. पूर्वसुरींचा व्यासंग, आधुनिक मराठी वाङ्‌मयाचे प्रगल्भ आकलन आणि पृथगात्म चिंतनशील भाष्य हे त्यांच्या समीक्षात्मक लेखनाचे गुणवैशिष्ट्य आहे. स्वातंत्र्योत्तर कालखंडात भारतीय प्रजासत्ताकाची नव्याने उभारणी झाली. निराळे राजकीय आणि सांस्कृतिक वास्तव अस्तित्वात आले. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मृत्यूनंतर देश संकटग्रस्ततेच्या संक्रमणावस्थेतून गेला. डहाके यांची पिढी फसवणुकीच्या, भ्रमनिरासाच्या आणि आदर्शवादाच्या हळूहळू झालेल्या विनाशाच्या काळात स्तब्ध झाली. अस्वस्थ झाली. एकीकडे हा कमालीचा अंधार आणि दुसरीकडे मानसिक क्षितिज रुंदावतानाही या पिढीने अनुभवले. मार्टिन ल्युथर किंग, चे गेव्हारा, रेजिस डेब्रे आणि इल्विस प्रीस्ले हे विश्‍वाच्या कानाकोपऱ्यातील मोहरे विचारधनाच्या संदर्भात वसंत आबाजी डहाके यांना अनुभवता आले. राजकीय, सामाजिक वाङ्‌मयीन आणि सांस्कृतिक पर्यावरणाची उभारी डहाके यांच्या प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्त्वाला प्रेरणा देऊन गेली. विसावे शतक हे सर्वार्थाने वादळी शतक होते. विशेषतः त्याचा उत्तरार्ध जीवनमूल्यांच्या ऱ्हासाचा ठरला. या दुखऱ्या वास्तवाचे ते साक्षीदार ठरले. प्रख्यात समीक्षक डॉ. विजया राजाध्यक्ष यांनी वसंत आबाजी डहाके यांचा 'कोसळत्या शतकाचा कवी' असा उल्लेख केलेला आहे, तो अर्थपूर्ण आहे. 


बेलो-यातून सुरू झाला प्रवास


वसंत आबाजी डहाके हे त्यांचे संपूर्ण नाव. याच नावाने त्यांनी आपले लेखन केले. त्यांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील बेलोऱ्यास ३० मार्च १९४२ ला झाला. त्यांचे वडील त्या गावचे पाटील होते. बेलोऱ्यास त्यांचे घर आणि शेती होती. डहाके दहा वर्षांचे होईपर्यंत बेलो-यास राहिले. त्यांचे प्राथमिक शिक्षण बेलोऱ्यास झाले. माध्यमिक शिक्षणासाठी ते चंद्रपूरला गेले. पाचवीपासून बी.ए. पर्यंत ते चंद्रपूरला राहिले. डहाके यांच्या आईचे माहेर चंद्रपूर जिल्ह्यातले. चंद्रपूरच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये त्यांचे माध्यमिक शिक्षण झाले. १९५८ मध्ये ते एस. एस. सी.ची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्याच वर्षी चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे जनता कॉलेज निघाले. गावातच कॉलेज निघाल्यामुळे त्यांनी तेथेच प्रवेश घेतला. वणीचे देवराज गोहोकर या कॉलेजचे प्राचार्य होते. त्यानंतर गोरखनाथ महाजन हे प्राचार्य झाले. प्रा. भाऊ मांडवकर हे त्यांचे मराठीचे प्राध्यापक होते. ते सर्जनशील लेखक होते. त्यांनी त्यांना उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले. याच काळात डहाके यांना कविता करण्याचा छंद जडला. याबाबतीतही प्रा. मांडवकरांनी त्यांना प्रोत्साहन दिले. कृष्णा चौधरी आणि वर्गमित्र पुरुषोत्तम वनकर यांना कवितेची गोडी होती. त्यांच्या सहवासात डहाके यांची कविता बहरत गेली. बी.ए.च्या पहिल्या वर्षांत असताना त्यांची 'एक आगळा पक्षी' ही कविता 'सत्यकथा' मासिकात प्रसिद्ध झाली. पुढे सुरेश द्वादशीवार यांच्यासारखा संवेदनशील आणि धडपड्या स्वभावाचा मित्र त्यांना लाभला. 

लोकसंचिताचे कवितेतून प्रतिबिंब


शालेय वयापासूनच त्यांना वाचनाची गोडी लागली. चंद्रपूरच्या शाळेत असताना एका मित्राने त्यांना बाबूराव अर्नाळकरांची पुस्तके आणून दिली. चातुर्मासाच्या दिवसांत त्यांचे वडील 'नवनाथांच्या कथा', 'हरिविजय', 'पांडव प्रताप', 'जैमिनी अश्‍वमेध' आणि 'शिवलीलामृत' इत्यादी पोथ्या वाचत. याचा सखोल संस्कार डहाके यांच्यावर झाला. 'किर्लोस्कर', 'स्त्री' आणि 'मनोहर' ही मासिके त्यांच्या वाचनात येत असत. 'सत्यकथा' मासिक आणि 'मौज' साप्ताहिक त्यांच्या हाती आले. श्री. ना. पेंडसे आणि गो. नी. दांडेकर यांच्या कादंबऱ्या त्यांच्या वाचनात आल्या. बी.ए.च्या शेवटच्या वर्षांपर्यंत कुसुमाग्रज, बा.भ. बोरकर, पु. शि. रेगे, अनिल, शरच्चंद्र मुक्तिबोध, बा.सी. मर्ढेकर आणि इंदिरा संत इत्यादी कवींचे कवितासंग्रह त्यांनी वाचले. १९६० दरम्यानचा काळ हा त्यांच्या ऐन तारुण्याचा काळ. नवसाहित्याच्या ऐन बहराचा हा काळ होता. एकीकडे हा असीम आशावादाचा कालखंड होता. आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील नव्या आशा- आकांक्षांचा, नव्या स्वप्नांचा हा कालखंड होता. दुसरीकडे राष्ट्रीय जीवनातील स्वप्नभंगाचेही ते दिवस होते. या परस्परविरोधी प्रवाहांचे हेलकावे त्यांच्या संवेदनशील मनामध्ये निर्माण होत होते. त्यातून त्यांची कवी म्हणून संवेदनशीलता घडत गेली. ज्या चंद्रपूरच्या परिसरात डहाके वाढले तो विदर्भ - महाराष्ट्राचा अतिपूर्वेकडील भाग होता. त्या प्रदेशाला प्राचीन परंपरा लाभलेली होती. आंध्र प्रदेशाच्या सीमा या परिसराला भिडलेल्या होत्या. कमी पावसाचा हा प्रदेश पण समृद्ध संस्कृतीचे हे माहेरघर होते. सातवाहनांचे आणि वाकाटकांचे येथे एकेकाळी साम्राज्य होते. बौद्धधर्माचा प्रभाव होता. हा सारा इतिहास, भाषा, लोकसंचित आणि निसर्ग डहाके यांच्या कवितेतील प्रतिमाविश्‍वातून प्रतिबिंबित झालेला आहे. कोरड्या आणि जाळणाऱ्या उन्हाळ्याची रूपके, खडकांची न संपणाऱ्या रस्त्यांची आणि मृगजळाची रूपके त्यांच्या कवितेत अवतरलेली आहेत. संतपरंपरेचा प्रभाव त्यांच्यावर पडलेला होता. 

कवितेत जन्मली नवी प्रतिमासृष्टी


मराठी कवितेच्या क्षेत्रात नव्या पाऊलखुणा उमटविण्यात डहाके यांच्या कवितेने महत्त्वपूर्ण वाटा उचललेला आहे. त्यांच्या जाणिवेचा अवकाश अत्यंत व्यापक. जागतिक महत्त्वाच्या घटनांचे, समकालीन विचारप्रवाहांचे आणि वाङ्‌मयप्रकारात घडलेल्या नव्या परिवर्तनांचे संस्कार त्यांनी मनात मुरवून घेतलेले आहेत. तिसऱ्या संभाव्य महायुद्धाची पडलेली छाया, देश-परदेशातील महनीयांचे मृत्यू, स्वातंत्र्यासाठी झालेला संघर्ष आणि त्यात झालेली जीवितहानी, विद्यार्थी आंदोलने, मूलतत्त्ववादी विचारप्रणालीचा वाढता प्रभाव आणि मार्क्‍सवादी विचारसरणीचा अस्त यामुळे जग ढवळून निघाले होते. या साऱ्या मंथनप्रक्रियेतून डहाके यांची कविता नवी प्रतिमासृष्टी घेऊन जन्मास येत होती. समकालीन कवींच्या समानधर्मेपणाशी ती संवाद साधीत होती. आयुष्यामध्ये वेगवेगळ्या कारणांसाठी केलेली स्थलांतरे त्यांच्या अनुभवविश्‍वात नवी भर टाकत होती. त्यांच्या चित्रातील अस्वस्थता भावात्मक आणि सर्जनात्मक अनुभूतींना नवी प्रेरणा देत होती. १९६६ मध्ये मेच्या अंकात त्यांची प्रदीर्घ "योगभ्रष्ट' ही कविता प्रसिद्ध झाली. नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने 
अमरावती, हिंगणघाट पुन्हा अमरावती अशी त्यांची भ्रमंती चाललेली होती. 

योगभ्रष्ट


'योगभ्रष्ट' हा त्यांचा पहिला कवितासंग्रह १९७२ मध्ये प्रसिद्ध झाला. त्यातील सर्व कविता १९६६ ते १९७१ या काळातील आहेत. त्यांच्या कवितांतून आणि रेखाटलेल्या चित्रांमधून त्यांच्या अंतर्मनातील तीव्र तडफड, अस्वस्थता आणि उद्रेक अत्यंत पारदर्शी शब्दांत प्रकट झालेला आहे. समांतरपणे मनातील भावकोमल मृदू स्वर या कवितेत मुखर झाले आहेत. प्रेमविषयक अनुभूती त्यांनी उत्कटतेने व्यक्त केली आहे. समकालीन समाजवास्तवाचा सारा दाह आणि व्यक्तिमनातील प्रक्षोभ, उद्वेग त्यांच्या 'योगभ्रष्ट' या संग्रहातील कवितेतून व्यक्त होतो. 

अंतर्मुख करणारा कवितेचा भावनाशय


१९७० मध्ये त्यांचा 'शुभवर्तमान' हा दुसरा कवितासंग्रह प्रसिद्ध झाला. १९७५ च्या आणीबाणीनंतर देशातील स्थितीत आमूलाग्र बदल जाणवायला लागला. बौद्धिक क्षेत्रात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले. विचारांचे, भावभावनांचे आणि संवेदनांचे बराकीकरण करण्याची प्रक्रिया राज्यकर्त्यांकडून घडली. या सामाजिक आणि सांस्कृतिक पार्श्‍वभूमीवर जनतेच्या मनात निर्माण झालेला थरकाप, किंकर्तव्यमूढता आणि अस्तित्वशून्यता यांचे विदारक चित्रण 'शुभवर्तमान'मधील 'नखे', 'नटासाठी पार्श्‍वसूचना', 'मोर्चा', 'क्रांती', 'मीठ महाग झालं की उंदीर मारण्याचं औषध', 'विचार झाला पाहिजे', 'अमानुष सत्तेचे दिवस', 'वृत्तपत्र' व 'वाचकांचा पत्रव्यवहार' या कवितांमधून डहाके यांनी केलेले आहे. सामाजिक संवेदनशीलतेचे उत्कट आणि प्रगल्भ रूप 'शुभवर्तमान'मधील कवितांमधून आढळून येते. 


'शुनःशेप'मध्ये या जीवनचिंतनाला वेगळी मिती प्राप्त झालेली आहे. देशातील राजकीय परिस्थितीवरील आणि प्रवृत्तींवरील भाष्य करणाऱ्या कवितांचा समावेश या संग्रहात झालेला आहे. 'पोट', 'यायचे ते आलेच नाहीत', 'मुलं हसताहेत', 'नकार', 'प्रेत', 'शब्द प्रभूचं स्वागत' आणि 'परिस्थिती' या 'शुनःशेप'मधील कविता लक्षणीय आहेत. 'अदृष्टाचं काव्यशास्त्र', 'अस्वस्थचित्र हस्ताक्षर', 'काळे कागद', 'अस्वस्थ रस्त्यांवरून' आणि 'देव' या कवितेतेली भावनाशय अंतर्मुख करणारा आहे. 

दाहक वास्तवाची 'चित्रलिपी'


'चित्रलिपी' या कवितासंग्रहामध्ये माणसाचे एकाकीपण, किता आणि निराशा यांचे दर्शन घडते. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात सामूहिक दुःखाचे स्वरूप अनुभवाया मिळाले. एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकातही या देशातील राजकीय, धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात जी पडझड झालेली आहे त्याचे भीषण चित्र त्यांनी रेखाटले आहे. 'वर्तमानाविषयी काही विचार', 'शतक', 'सुगी', 'कार्यकर्ते', 'दाद', 'उमेदवार निवडीची बैठक', 'महानगर', 'प्रश्‍न', 'कोंडवाडा', 'पुतळे', 'वाट' आणि 'कीा नाहीचं गाणं' या कवितांमधून दाहक वास्तवाविषयीची डहाके यांची प्रगल्भ जाणीव व्यक्त होते. 

अधोलोक


कवितेबरोबरच वसंत आबाजी डहाके यांनी कादंबरी लेखन केलेले आहे. 'अधोलोक' ही त्यांची पहिली कादंबरी १९७५ मध्ये प्रसिद्ध झाली. ती एक गंभीर शोकात्मिका आहे. भीती, अपराध, लाचारी, क्षुधा, व्यक्तित्वहीनता आणि असंबद्धता आणि या सगळ्यांवर आपले वर्चस्व गाजविणारी विराट सत्ता आणि तिच्या टाचेखाली चिरडून पराभूत झालेल्या एका माणसाची कथा या कादंबरीत गुंफली आहे. सत्तेपुढे माणूस कसा हतबल होतो. सर्वंकष विनाशाच्या गर्तेत कसा फेकला जातो, याचे विदारक दर्शन या कादंबरीतून घडते. विविध पातळ्यांवर फिरणारा हा अनुभव वसंत आबाजी डहाके वास्तव आणि कल्पनीय यांची कलात्म गुंफण करून मांडलेला आहे. मानवी जीवनातील मूलभूत समस्यांचा हा शोध आहे. डहाके यांच्या प्रतिभेतील काव्यात्मकतेचा धर्म येथे प्रकट झालेला आहे. 

नातेसंबंध ते आत्मकेंद्री


'प्रतिबद्ध' आणि 'मर्त्य' या वसंत आबाजी डहाके यांच्या लघुकादंबऱ्या आहेत. या दोहोंच्या कथानकात काही समान दुवे आहेत. अंतःसूत्र जाणवते. विसाव्या शतकातील प्रमाथी सत्ताकेंद्रामुळे व्यक्तिजीवनाची होणारी होरपळ 'प्रतिबद्ध'मध्ये चित्रित केलेली आहे. शहरामध्ये होत गेलेल्या परिवर्तनाचा वेध येथे प्रभावीपणे घेण्यात आलेला आहे. कालपर्यंत कौटुंबिक नातेसंबंधांना जपणारी माणसे आज कशी आत्मकेंद्रित झाली, असा प्रश्‍न इथे उपस्थित केला आहे. एका प्रश्‍नातून अनेक प्रश्‍न निर्माण होतात. प्रश्‍नोपनिषद निर्माण होते.

'मर्त्य'मध्ये आत्मशोधाची प्रक्रिया 


'मर्त्य'मध्येही अंतर्मुखता आहे. माणसाचे कीटकासारखे जीवन येथे रंगविले आहे. एफिमेरॉनचे आयुष्य एक दिवसाचे. माणसाचे शंभर वर्षांचे म्हणजे त्याचा तो एक दिवसच. या प्रतीकात्मकतेतून वसंत आबाजी डहाके खूप काही सुचवून जातात. या जीवनात जन्म, मोठे होणे, जगण्यासाठी धडपड, संसार, अन्न शोधणे, बायकामुले, माया करणे, रडणंभेकणे, भांडणे, लढणे, अस्तित्व पणाला लावणे, महत्त्वाकांक्षा, वासना, इच्छा, कामक्रोधमोहमदमत्सर, जळणं, जाळणं, मुलांचे संसार, नातवंडांची तोंडे पाहणे, विचार करणे, कविता लिहिणे, नाटके बसविणे अकर्मण्य असणे आणि मरून जाणे. या कादंबरीत आत्मशोधाची प्रक्रिया आहे. समकालीन जीवनशैलीवरील हे जळजळीत भाष्य आहे. या दोन्ही लघुकादंबऱ्यांमध्ये प्रयोगशीलता आहे. कवितेसारखी मिताक्षरी रचना आहे. जीवनातील गतिमान प्रवाहाला कवेत घेण्याचे सामर्थ्य डहाके यांच्या भाषाशैलीत आहेत. मुखपृष्ठावरील, मलपृष्ठावरील आणि अंतर्भागात काढलेली मोजकीच रेखाचित्रे आशयसूत्रांना पुष्टी देतात. 

कवी असण्याचे आत्मभान


वसंत आबाजी डहाके हे स्वतः कवी. कवी असण्याचे आत्मभान त्यांच्या व्यक्तिमत्त्वात पुरेपूर आहे, शिवाय सर्जनशील साहित्यिक म्हणून जगत असताना समकालीन समाजवास्तव, राजकीय परिस्थिती, शिक्षणविश्‍व, वाङ्‌मयीन संस्कृती आणि समग्र सांस्कृतिक पर्यावरण याविषयीचे प्रगल्भ समाजभान त्यांना आहे. आत्मभान आणि समाजभान यांचा समतोल त्यांच्या व्यक्तिमत्त्वात असल्यामुळे त्यांच्यातील सर्जनशील प्रतिभेचा आणि त्यांच्या समीक्षा विचारातील प्रज्ञेचा कुठेही विसंवाद आढळत नाही. ते अव्वल दर्जाचे समीक्षक आहेत. "कवितेविषयी' या ग्रंथात त्यांनी सैद्धांतिकच आणि उपयोजित स्वरूपाची समीक्षा लिहिली आहे. त्यात जुन्या-नव्या कवींच्या काव्याचा परामर्श घेतलेला आहे. 
मराठी साहित्य : इतिहास आणि संस्कृती हा त्यांचा महत्त्वपूर्ण समीक्षाग्रंथ. मराठी साहित्यसृष्टीच्या प्रारंभापासून आतापर्यंतच्या प्रवाहांचे आणि अंतःप्रवाहांचे, वृत्तीप्रवृती विहंगमावलोकन या ग्रंथात आहे. मराठी माणसाचे जीवनसंचित, त्याची जीवनशैली आणि त्याने केलेली साहित्यनिर्मिती यांमधील अनुबंधाचा मर्मदृष्टीने घेतलेला हा शोध आहे. 
वसंत आबाजी डहाके हे मराठी साहित्यातील एक मानदंड आहेत.


- डॉ. सोमनाथ कोमरपंत


(दैनिक 'गोमंतक'मधून साभार)



वसंत आबाजी डहाके


वसंत आबाजी डहाके हे नाव मराठी वाङ्मयात सर्वतोमुखी झाले ते १९६६ साली 'सत्यकथे'च्या मे महिन्याच्या अंकात प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या 'योगभ्रष्ट' या दीर्घ कवितेमुळे. अत्यंत वेगळ्या प्रतिमा वापरून विधानात्मक शैलीत लिहिलेली ही कविता त्या काळातल्या तरुणाचं नैराश्य, दारुण स्वप्नभंग, वर्तमानाने केलेली कोंडी, त्याची परात्मता, पराभूतता या सर्वांना विलक्षण शब्दरूप देऊन गेली. डहाकेंची कविता उत्तरोत्तर आशयाच्या खोल डोहात उतरत गेली, हे 'योगभ्रष्ट', 'शुभ वर्तमान', 'शुन:शेप', 'चित्रलिपी' या त्यांच्या काव्यसंग्रहातून सर्वांनी प्रचीती घेतली. त्यांनी 'अधोलोक आणि र्मत्य' यासारख्या कादंबऱ्यांतून, 'सर्वत्र पसरलेली मुळं'सारख्या दीर्घ कवितेतून अस्तित्ववादी जाणिवेचा विराट प्रत्यय दिला. एकीकडे साहित्यात आपली अशी एक सलग ओळ लिहीत जाणाऱ्या या कवीने दुसरीकडे समीक्षेत आणि कोश वाङ्मयात केलेली कामगिरीही अशीच थक्क करणारी आहे. 'साहित्य आणि संस्कृती' हा ग्रंथ त्यांच्या प्रगल्भतेची खूणच आहे. मराठी साहित्यात कोशकारांची संख्या मुळातच कमी होती. अशा कामासाठी लागणारा व्यासंग आणि बृहदृष्टी असलेली माणसे दुमीर्ळ झाली आहेत. अशा काळात डहाकेसरांनी संक्षिप्त मराठी वाङ्मय कोश, वाङ्मयीन संज्ञा आणि संकल्पना कोश, शालेय मराठी शब्दकोश संपादित करून भाषेसाठी मोठेच काम करून ठेवले आहे. उत्सवी समारंभांपासून दूर राहून, प्रसिद्धीच्या झोतांपासून स्वत:ला वाचवत डहाके शांतपणे संदर्भ जमविणे, त्यांची यथार्थता ताडून पाहणे, वाचन-मनन करणे, भटकणे, नोंदी करणे, इतरांनी केलेल्या नोंदी अधिक अचूक होण्यासाठी त्यांवर काम करणे, अशा कामात व्यग्र राहत असतात. डहाकेसरांबरोबर काम करणे हा एक समृद्ध अनुभव असतो, यावर प्रकल्पांसाठी त्यांचे सहायक म्हणून काम करणाऱ्यांचे एकमत आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्वही त्यांच्या शब्दांप्रमाणेच अनाक्रमक परंतु ठाम आहे. कोणत्याही विचारसरणीच्या दावणीला स्वत:ला बांधून घेणे त्यांनी नाकारलेले आहे त्यामुळेच ते मौज परिवार आणि लोकवाङ्मय गृह या दोन्ही ठिकाणी सारख्याच सहजपणे आणि विश्वासाने वावरतात. अलीकडे त्यांनी 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या छायाचित्रात्मक चरित्रग्रंथासाठी केलेले काम महत्त्वाचे ठरले आहे. गोदावरी नदीसंबंधी त्यांचे मौलिक काम सुरू आहे. साहित्य आणि संस्कृती यांचा अन्योन्य संबंध शोधत माणसाच्या जडणघडणीच्या इतिहासाचा ताळेबंद ते मांडत आहेत. विदर्भ साहित्य संघाने त्यांच्या या सा-या कर्तृत्वाचा त्यांना 'जीवनव्रती पुरस्कार' देऊन उचित गौरव केला आहे. 


(म.टा. वरून साभार)


ससेहोलपट

स्वप्नांवर काठ्या पडतात
तेव्हा मी उठतो झोपेतून
चेह-यावरचे ओंगळ शब्द पुसत.

तर अशी ही चिरफाळलेली सकाळ
आणि त्याआधीची कटाची रात्र
आणि त्याहीआधीचा फितूर दिवस.

पाहतात मख्ख डोळ्यांनी
माझी सर्वांगीण ससेहोलपट.

- वसंत आबाजी डहाके

 (`योगभ्रष्ट'मधून)



१.
डहाकेंच्या कवितांचे
इंग्रजी अनुवाद येथे वाचा.


२.
डहाकेंच्या  
‘अमिताभ बच्चन’ 
या प्रसिद्ध कवितेचा अनुवाद
येथे वाचा.

|| एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर जन्म घेणा-या तान्ह्या मुला ||

`डॉ.श्रीकृष्ण राऊत यांच्या मराठी कविता’ या ब्लॉगवर वाचा : महाराष्ट्रातील प्रतिष्ठेचे अनेक पुरस्कार प्राप्त दीर्घ कविता : ‘एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर जन्म घेणा-या तान्ह्या मुला’ दीर्घ कविता येथे वाचा
गझलकार