वसंत आबाजी डहाकेंना काही वर्षांपूर्वी वासंती गाडगीळ
स्मृती पुरस्कार मिळाला होता तेव्हा ते म्हणाले होते,
अनेक पुरस्कार समित्यांवर काम करता करता
आपल्यासाठीही एखादा पुरस्कार असेल
हे मी विसरूनच गेलो होतो.
कधीही जाहीरपणे कुणाविषयी नाराजी व्यक्त न करणा-या
डहाकेसरांच्या मनातली सल अशी अवचित बाहेर आली
होती. त्यांना मिळालेला तो पुरस्कार मुळीच छोटा
नव्हता. त्यानंतर त्यांच्या 'मराठी साहित्य : इतिहास
आणि संस्कृती' या समीक्षा ग्रंथाला महाराष्ट्र फाउंडेशनचा
पुरस्कार मिळाला आणि आता 'चित्रलिपी' या
काव्यसंग्रहाला यंदाचा साहित्य अकादमी हा राष्ट्रीय
स्तरावरचा मोठा पुरस्कार मिळाल्यावर तर सगळी देणी
सव्याज फिटून गेल्यासारखं झालंय. यात दोन
वर्षांपूर्वीसाहित्य संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या
निमित्तानं झालेला मनस्तापही धुतला गेलाय.
अध्यापनासाठी मधली बरीच वर्षं मुंबईत काढल्यानंतर
'तुझं शहर मला आवडलेलं नाही...माझा श्वास घुसमटतो
तुझ्या उंच इमारतींमध्ये' म्हणत ते अमरावतीला जाऊन
बसले आहेत. मालटेकडी या आपल्या गावातल्या
परिसराच्या आठवणी, त्यानिमित्तानं होणारं चिंतन लिहून
काढण्यात रमले आहेत. तसे सदैव निरीच्छ वाटणारे
डहाके सर आता अधिक मोकळे निवांत होत असतानाच
हा पुरस्कार जाहीर झालाय. या पुरस्काराने जबाबदारी
वगैरे काही वाढलेली नाही, उलट आधीच त्यांनी
जबाबदारीने बरंच काही करून ठेवलंय त्याची कुणीतरी
अधिक जबाबदारीने दखल घेण्याचीच गरज आहे. कविता
तर पहिल्यापासून होत्याच, चित्रकलाही होती पण
प्राध्यापकी शिस्तीनं त्यांनी केलेली समीक्षा, वाङ्मय
कोशाचं काम, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या
फोटोबायोग्राफीची नेटकी संपादणी आणि साहित्याला
ऐतिहासिक काळाच्या पटलावर ठेवून संस्कृतीच्या वाहत्या
प्रवाहात साक्षेपी दृष्टीनं केलेला त्याचा तपास यांतून
त्यांची सर्जकता अनेक वाटांनी प्रवाही होत राहिली.
बाहत्तर साली वसंत आबाजी डहाके यांचा 'योगभ्रष्ट'
नावाचा कविता संग्रह बाहेर आला तेव्हा अनेक अस्वस्थ
तरुण त्याच्या प्रभावाखाली होते. विशेषत: 'योगभ्रष्ट' या
दीर्घकवितेच्या तर अधिकच. कॉलेज मधल्या मुलांना या
कवितेवर रंगमंचीय आविष्कार सादर केले. सत्तर
सालातला ठसठसता असंतोष, सामाजिक स्तरावर
जाणवणारी आणि तरुणांच्या व्यक्तिगत जीवनजाणीवेत
पसरलेली निराशा, उद्वेग याचा प्रखर आणि असहाय उद्गार
त्यांना डहाकेंच्या कवितेत सापडला. सत्तरच्या दशकातले
अस्तित्ववादी साहित्यिक काफ्का, काम्यू, सार्त्रच्या प्रेमात
होते. स्वत: डहाके काफ्काच्या खूप प्रभावाखाली
असल्याचं त्यांच्या कविता आणि कादंब-यांमध्येही स्पष्ट
दिसायचं पण हा प्रभाव लपवण्याची खटपट डहाकेंनी
कधी केली नाही. उलट हा प्रभाव इतका रिचवला की
काफ्काने पेरलेली जीवनजाणीव, त्यातली परात्मता याचा
त्यांनी भारतीय समाजव्यवस्थेत जगताना अचूक
अन्वयार्थ लावला.
डहाकेंच्या कवितांच्या गद्यप्राय ओळी अंतत: आपल्यावर
एक स्पष्ट परिणाम करत जातात. या ओळींतून तुम्ही
कविताच नाहिशी करू बघता आहात काय, असा प्रश्न
एका मुलाखतकर्त्याने त्यांना केला होता तेव्हा ते म्हणाले
होते, 'मला कविता नव्हे तर कवितेतली गेयता नाहिशी
करायची आहे. कविता, कथा, ललित निबंध यांच्यातला
भेद नाहिसा व्हावा आणि त्यांच्या रचनेबाबत संभ्रम
निर्माण व्हावा असं मला करायचं आहे.'
आपली कविता रोजच्या जगण्याच्या पातळीवर आणू
बघणा-या सर्जकाच्या मनातली ही चित्रलिपी खूप सोपी
आणि खूप गहन आहे.
- जयंत पवार (म.टा.वरून साभार)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा