शुभेच्छा : दिवाळी २०११

शुभेच्छा : दिवाळी २०११

तमा नाही अंधाराची
एक पणती लावूदे;
फार वाटते एकटे
हात हातात राहूदे.

इवल्याशा पणतीने
दूर पळतो अंधार;
लढणा-या माणसाला
देते शुभेच्छा आधार.

डहाकेंची चित्रलिपी समजून घेताना... : विश्राम गुप्ते




‘चित्रलिपी’ एकाच वेळी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक 
जीवनावरचं खालच्या पट्टीतला सूर लावणारं समूहगीत आहे. डहाक्यांच्या 
सामाजिक पिंडाशी आणि त्यांच्या देवदत्त प्रवृत्तीशी ही रचना मेळ खाणारी आहे. 
डहाक्यांचा गेल्या चाळीसेक वर्षाचा वाङ्मयीन प्रवास तल्लख बुद्धीने सुरू आहेच, 
पण त्याचा सूरही शांत आहे. डहाक्यांच्या बाबतीत हे नोंदवण्यासारखं आहे.
वसंत आबाजी डहाके यांच्या ‘चित्रलिपी’ या कविता संग्रहाला यंदाचा साहित्य 
अकादमी पुरस्कार घोषित झाला. परवा डहाके गोव्यात असताना त्यांनी 
एकूणच मराठी कवितेवर जे बीजभाषण केलं, त्यातली त्यांची काव्यार्थाला 
प्राधान्य देणारी आणि सत्य हेच निक्षून बोलणारी भूमिका कुठल्याही तोतया 
नसलेल्या कवीला आवडून जाईल अशीच आहे.
सुदैवाने नवी किंवा नवोत्तर जाणीव मराठी वाड्मयीन पर्यावरणाला नवी नाही. 
मर्ढेकरांपासून जर या जाणिवेचा प्रवास सुरू झाला असं मानलं तर तिला 
व्यामिश्रतेचे धुमारे फुटले ते दिलीप पुरुषोत्तम चित्रे, अरुण कोलटकर, भालचंद्र 
नेमाडे, मनोहर ओक आदी ‘अँग्री यंगमेन’च्या भन्नाट कवितांमुळेच.
डहाकेंची कविता तशी ‘अँग्री’ नाही. ती ढसाळांच्या कवितेसारखी मूर्तिभंजक 
नाही. ग्रेसच्या कवितेसारखी गूढ नाही. बोरकर, पाडगावकर, बापटांच्या 
कवितेसारखी सौंदर्यवादी नाही, विंदांच्या किंवा कुसुमाग्रजांच्या कवितेसारखी 
आदर्शाचा ध्यास घेणारी नाही. मग डहाकेंची कविता नेमकी कशी? साहित्य 
अकादमी पुरस्कारास पात्र ठरल्यानंतर त्यांच्या ‘चित्रलिपी’चं त्रोटक मूल्यांकन 
करू या.
‘चित्रलिपी’मध्ये बखर या पहिल्याच कवितेला डहाकेंचा जाहीरनामा म्हणता 
येईल. शब्दांची मलमपट्टी नाकारून, यमकप्रासांचा रुणुझुणु नाद भिरकावून, 
भावनाविचारांची तकलुपी कच्ची घरं बांधण्याच्या रोमॅँटिक प्रवृत्तीला झुगारून 
डहाक्यांची ‘चित्रलिपी’ ठिक-या उडालेल्या मानवी अस्तित्वावर मर्मभेदी भाष्य 
करते. त्यांच्याच भाषेत, ‘जाड्या भरड्या गोणपाटासारखं.’
डहाके चाळीसेक वर्षांपूर्वी जोरात असलेल्या ‘लिटिल मॅगझिन’ चळवळीचे 
(तुतारी न फुंकणारे) एक ‘शूर शिपाई.’ प्रस्थापित अभिरुचीला शरण गेलेली 
आणि जाहीर कोडकौतुकाने सुस्त झालेली तुंदीलतनू संवेदनशीलता डहाकेंच्या 
पिढीतल्या किमान दोन डझन कवींनी नाकारली आणि कवितेची नवी पायवाट 
खोदली. साहित्यात नवं बांधकाम करण्यासाठी जिगर लागते. डहाक्यांनी  ती 
दाखवली.
डहाक्यांची एकूणच कविता, पण प्रामुख्याने त्यांची ‘चित्रलिपी’ समजावून 
घेताना डहाक्यांचा प्रस्थापित संवेदनशीलतेविरुद्धचा हा पवित्रा दुर्लक्षून चालणार 
नाही. प्रस्थापितता कायम टिकून राहण्यास उतावळी असते. विस्थापितता 
तिला हळूहळू धक्के देत, तिचं आसन डळमळीत करते. डहाक्यांच्या पिढीने हे 
धक्के देण्याचं पवित्र काम कुठलेही हिशेब मनात न ठेवता समरसून केलं.आज 
मराठीत लोकप्रिय, कौतुकोत्सुक, मंचप्रिय ‘रुणुझुणु नाद’ करणा-या काव्याला 
पर्याय मिळाला आहे. या पर्यायी वाड्मयीन अभिरुचीचा एक झेंडा 
डहाक्यांसारख्या वय आणि वृत्तीने प्रगल्भ कवींच्या खांद्यावर आहे. गंमत 
म्हणजे डहाक्यांच्या या नवकवितेचा इमला प्राय: साध्यासुध्या म्हणजे गद्य 
आणि सुगम शब्दांवर बांधलेला आहे. तरीही डहाक्यांची कविता अंतमुर्ख आहे, 
चिंतनशील आहे, व्याकूळ आहे, ऋजू आहे आणि तरीसुद्धा भेदक आहे. हे 
रसायन अनपेक्षित आहे. पुरस्कारप्राप्त ‘चित्रलिपी’ वाचताना भोवतालच्या 
सामाजिक, सांस्कृतिक चित्रांच्या सरळसोट नव्हे; तर वेड्यावाकड्या, गुळगुळीत 
नव्हे; तर खडबडीत, गोडगोड नव्हे; तर कडू-आंबट अशा तापदायक प्रतिमांचा 
छळवाद सुरू होतो. चित्रलिपीत समकालीन प्रतिमांचा एकच गजबजाट आहे. 
‘चित्रलिपी’ एकविसाव्या शतकाचं विषण्ण वास्तव आहे.
डहाक्यांच्या ‘चित्रलिपी’त प्रतिमांची अफरातफर होत नाही. म्हणजे जगणं एक 
आणि लिहिणं दुसरंच, असं काही ते करत नाहीत. जगणं, सगळंच्या सगळं 
कवितेत ओतणं हे आधुनिक संवेदनशीलतेचं व्यवच्छेदक लक्षण. डहाकेंमधला 
कवी आणि माणूस यांची बेमालूम सरमिसळ होते.‘चित्रलिपी’ एकाच वेळी 
राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जीवनावरचं खालच्या 
पट्टीतला सूर लावणारं समूहगीत आहे. डहाक्यांच्या सामाजिक पिंडाशी आणि 
त्यांच्या देवदत्त प्रवृत्तीशी ही रचना मेळ खाणारी आहे. डहाक्यांचा गेल्या 
चाळीसेक वर्षांचा वाड्मयीन प्रवास तल्लख बुद्धीने सुरू आहेच, पण त्याचा 
सूरही शांत आहे. डहाक्यांच्या बाबतीत हे नोंदवण्यासारखं आहे.अबोध 
व्याकुळता, विश्वाच्या पसा-यात मानवाला आलेलं पोरकेपण, त्याचं तुटलंपण, 
माणसांतला विसंवाद, आप-पर भाव, त्यातून येणारा निर्मम व्यवहार, 
एकाकीपण, व्यक्ती-समष्टीचं द्वंद्व हे अस्तित्ववादी तत्त्वचिंतनाचे मुख्य खांब. 
डहाकेंचं गद्य लिखाण या तत्त्वचिंतनाचा हुंकार आहे. त्यांची कवितासुद्धा तशीच 
आहे.


मी कोंडून ठेवतोय झाडाचं गाणं
माझ्या आत गच्च;
अलीकडे, सांप्रत,
आजकाल, सद्य:स्थितीत.


‘झाडाचं गाणं’ या त्यांच्या कवितेच्या या शेवटल्या ओळीत त्यांनी चार 
निरनिराळे शब्द वापरून एकच काळ (चालू काळ) अधोरेखित केलेला दिसतो. 
हे सकारण आहे. डहाक्यांना चालू क्षण कवितेत धरायचा आहे. किंबहुना याच 
एका क्षणज्योतीवर त्यांचं त्राटक सुरू आहे. डहाक्यांच्या कवितेतल्या पोपटाचा 
प्राण समकालीनतेमध्ये वसतो. वसंत आबाजी डहाके नावाच्या राजपुत्राला हे 
ठाऊक आहे.विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर आणि वसंत बापट या आनंद 
त्रयीने महाराष्ट्रात एकेकाळी हंगामा करून टाकला होता. या त्रयीनंतर उगवली 
ती चित्रे, कोलटकर, नेमाडे नावाची त्रयी. आधुनिक मराठीचं हे तापत्रय. या 
तापत्रयाशी डहाक्यांचं जैविक नातं. डहाके या तापत्रयी काव्यजाणिवेचे वारसदार 
आहेत. ‘चित्रलिपी’ याच वेदनायुक्त संवेदनशीलतेचा परिस्थितीजन्य 
पुरावा.साठोत्तरीच्या पिढीत मराठीत आध्यात्मिक, आधिभौतिक आणि 
आधिदैविक अशा तीन प्रकारच्या पीडांना अभिव्यक्ती मिळत गेली. डहाक्यांची 
चित्रलिपी या तिन्ही पीडांना समकालीन सामाजिक परिप्रेक्ष्यामधून जोखून 
बघते. तिची चिकित्सा करते. हे करताना तिचा पवित्रा प्राय: हताश भाष्याचा 
असतो. तो घोषणाबाजी करणा-या  कवीचा नसतो. डहाक्यांच्या बाबतीत ही 
दुसरी नोंदवण्यासारखी गोष्ट.


कवीचे डोळे उघडे असतात तोवरच
त्याच्या चेह-यावर वाचता येतात
जगण्याच्या प्रतिमा.
ते मिटले की काहीच उरत नाही
हजारो योजनांच्या भणभण प्रदेशात.


 ‘जगण्याच्या प्रतिमा’ या कवितेतल्या ओळींमधला तो भणभण प्रदेश. हीच 
जगड्व्याळ व्याकुळता. कवीला कायम छळणारी, वहाणेतल्या खडय़ासारखी 
टोचणारी, उद्विग्न करणारी. कवी किंवा कविता स्वयंभू नाहीत, असं सुचवताना 
डहाके याच कवितेत सुरुवातीला केवळ शब्दांनी झाडाचं पानसुद्धा हलत नाही, 
ही सार्थ खंत व्यक्त करतात.
शब्दांना अवास्तव महत्त्व देणारी आनंदमिमांसा करण्यात डहाके असमर्थ ठरले. 
ही असमर्थता त्याच्या डीएनएमध्येच वसते. त्यांच्या रक्तपेशीचा भाग म्हणून. 
रोमॅँटिक कवींच्या डीएनएमध्ये उसना उत्साह दुथडी भरून वाहात होता, आहे 
आणि असेल. डहाक्यांची जातकुळी वेगळी.डहाक्यांची ही काव्यसाधना निर्वात 
पोकळीत घडली नाही. तिचे सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय संदर्भ 
आपल्या परिचयाचे आहेत. अशा या व्यामिश्र, अमानुष, यांत्रिक आणि अनात्म 
समकालीनतेला षड्ड ठोकून सडपातळ अंगयष्टीचे डहाके आव्हान देतात. 
समकालीनतेच्या चेटकिणीच्या झिंज्या ते ओढतात, म्हणून ‘चित्रलिपी’ शूर 
कविता ठरते.‘चित्रलिपी’ लिहिणारे डहाके हे उत्तम चित्रकारसुद्धा आहेत. 
किंबहुना त्यांच्या कविता या चार्कोलमधल्या रेखाचित्रासारख्या थेट आणि 
जलरंगासारख्या पारदर्शक होऊन उमटतात.


मी उतरायचो
वाघिणीच्या डब्याचीच केबिन असलेल्या लहानखु-या स्टेशनच्या
मोकळ्या प्लॅटफार्मवर
आणि शोधायचो ओळखीचे बैल.
सावलीत विसावलेले, कडबा चघळीत असलेले.
ते मला ओळखत असत की नाही कोणास ठाऊक
पाठीवर हात ठेवला की थरथर तेवढी जाणवायची
आणि डोळ्यात नेमकं काय आहे, याचाथांग नाही लागायचा.


अशी चित्रमय अभिव्यक्ती असलेले डहाके हे पहिले चित्रकारच, मग कवी. 
मराठीतले काही दादा कवी चित्रकार होतेच. दिलीप पुरुषोत्तम चित्रे उत्तम 
चित्रकार होते, अरुण कोलटकरांनासुद्धा चित्रं काढणं आवडे, डहाके असे चित्रकार 
आहेत. तसेच ते कवी, कादंबरीकार, समीक्षक, वाङ्मयाचे इतिहासकारसुद्धा 
आहेत.जगणं, प्रेम करणं आणि मरणं या तीनच गोष्टी माणसासाठी सर्वाधिक 
महत्त्वाच्या; पण कवी या तीन गोष्टी भयंकर जीव ओतून करतो. जगता जगता 
तो प्रेम करतो आणि प्रेम करता करता तो मरण आठवतो. चित्र्यांच्या कवितेत 
मरण आहे. कोलटकारांच्या कवितेत निर्मम पार्थिवता आहे. डहाक्यांच्या 
कथनात्मक काव्यात मरणाची अथांग व्याकुळता आहे. कशी ती
‘चित्रलिपी’तल्याच ‘टाटा मेमोरिअल हॉस्पिटलमधून वावरताना’ 
या कवितेत बघा : 


आता डोक्यात चंद्र घेऊन उभं राहायचं
विठ्ठलासारखं, कमरेवर हात ठेवून.
नाही तर विष्णूसारखं पडून राहायचं
पाण्यावर तरंगत.
चांदणं पाझरत राहील आत आत
सगळ्या नळ्यांमधून सावकाश.
आपलं शरीर इथं सापडतं,
संतांना विठ्ठल सापडल्यासारखं.


.डहाक्यांचं मर्त्यतेचं भान असं पौराणिक, ऐतिहासिक आणि आधुनिक 
प्रतिमांद्वारे चितारलं गेलं. कॅन्सर वार्ड हा हरेक माणसासाठी हादरवून टाकणारा 
अनुभव. डहाक्यांसारखा कवी या भयाचं सोनं करतो. चांदणं, नळय़ा, विठ्ठलाचं 
सापडणं, संत या प्रतिमा कवीच्या चित्रमय आस्थेचा भाग होतात. 
‘चित्रलिपी’तली प्रत्येक कविता अगम्य मानवी अस्तित्वाला चिमटीत धरते 
तरीही ती ढळढळीत जगण्याबद्दल आहे. हे जगणं राजकीय जाणिवेला नाकारून 
घडूच शकत नाही. डहाक्यांच्या ब्रह्मांडात हे चालू जगणं अवघ्या जीवन 
जाणिवेला कवटाळणारं आहे. तरीही रुढार्थाने डहाक्यांना कोणीही ‘सामाजिक 
जाणिवेचा कवी’ हे बिरुद लावू शकणार नाही.
‘चित्रलिपी’ ही सामाजिक कविता नाही, मात्र सामाजिक पर्यावरणात ती घडते. 
तिची स्पंदनं आणि तिचे व्हायब्रेशन्स कायम विस्तारत जातात. व्यक्तीच्या 
नेणिवेसापासून सुरू होऊन समाजाला, अखेरीस ब्रह्मांडाला कवटाळतात. 
‘चित्रलिपी’चं हेच वैशिष्ट्य.
डहाके मूलत: प्रखर अस्तित्ववादी कवी, म्हणून त्यांना शब्दांचा वेडाभाबडा 
उत्सव साजरा करता येत नाही. कवितेला ‘परफॉर्मिग आर्ट’ करणा-या कवींच्या 
घोळक्यात डहाके कदाचित विरूप भासतील. हे विरूपपण जोपासणं म्हणजेच 
काव्यसाधना. नव्या कवींनी डहाक्यांकडून हिंमत घ्यायची ती या 
बाबतीत.सत्याशी समझोता करणारी, सत्तेशी संधिसाधू लगट करणारी, 
कवितेकडे करिअर म्हणून बघणारी स्मार्ट दृष्टी डहाक्यांना नाही. अवघं आयुष्य 
कवितेला अर्ध्यासारखं दान दिलेल्या या शांत, पण प्रगल्भ कवीचा शब्द 
साक्षात्कार केवळ भेदक आहे.


शब्द फोडलाकी
त्यातून अर्थाऐवजी
एखादा कीटक निघतो,
असे झाले.’


चित्रलिपीचा मात्र प्रत्येक शब्दन् शब्द अर्थाने भारीत आहे. कारण तो थॉमस 
मान म्हणतो तशा ‘सच्च्या हताशे’तून, व्याकुळतेतून, जगण्याबद्दलच्या असीम 
गलबल्यातून व्यक्त झालेला आहे.कवी काय काम करतो? असं दिलीप चित्र्यांनी 
विचारलं होतं. त्याचं उत्तर खूप मोठं आहे. डहाक्यांच्या ‘चित्रलिपी’बद्दल 
बोलताना असं म्हणावंसं वाटतं की, चिरंतन दु:खाला सामोरा जातो. त्या 
दु:खाशी तादात्म्य पावतो.दु:खाची अदृश्य रेषाआता प्रकट झाली आहे माझ्या 
हातावर.आणि हळूहळू पुसट होत नाहीशा होताहेतभाग्यरेषा, आयुष्यरेषा.
‘चित्रलिपी’ अशा व्याकुळतेच्या करड्या कॅनव्हासवर उमटते. या लिपीच्या 
रेषान् रेषा काळजाचा ठाव घेतात. जाणीव समृद्ध करतात. नव्या जाणिवेने 
वाचक उत्कट होतो.
ही जाणीव मराठीतल्या नव्या संवेदनशीलतेची नांदी आहे. साहित्य अकादमी 
पुस्काराने या नवजाणिवेला राजमान्यता मिळाली. एकदा ती मिळाली की 
लोकमान्यता मिळतेच, असं काही म्हणता येईल का?


सुगी


काळजाला घरं पाडणारा सुगीचा काळ
आलेला आहे.
अमाप पीक उगवलेलं आहे
भ्रष्ट इच्छांचं.


मी जड पावलांनी चालत जातो
वर्तमानाच्या अंधारलेल्या गल्लीबोळातून.
मी कमावलेलं नाही
माझं कातडं.
माझ्या खिशात नाही
मिठ्ठास भाषा
भोवतीच्या व्याकरणानुसार वागणारी.
माझे रागद्वेष विझून जाणा-या
वातीसारखे आहेत
हलक्या झुळुकेनं.
रस्त्यावर टाकून दिलेल्या मुलासारखा
पडलेला आहे सगळा देश.
त्याच्या आसपास विखुरलेली आहेत किडलेली सहानुभूतीची कणसं.


माझ्या मेंदूपर्यंत पोहोचत नाही
माझ्या बोटांचं बधिर होणं.
लवकरच मागावर असलेला काळ
लागवड करील माझ्या मस्तकात
क्षुल्लक आकांक्षांची.
मुळंच खाऊन टाकणारा बहर येईल
माझ्याही असण्याला.


-वसंत आबाजी डहाके


‘चित्रलिपी’ (लोकवाङ्मय गृह )


(‘प्रहार’वरून साभार) 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

|| एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर जन्म घेणा-या तान्ह्या मुला ||

`डॉ.श्रीकृष्ण राऊत यांच्या मराठी कविता’ या ब्लॉगवर वाचा : महाराष्ट्रातील प्रतिष्ठेचे अनेक पुरस्कार प्राप्त दीर्घ कविता : ‘एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर जन्म घेणा-या तान्ह्या मुला’ दीर्घ कविता येथे वाचा
गझलकार