शुभेच्छा : दिवाळी २०११

शुभेच्छा : दिवाळी २०११

तमा नाही अंधाराची
एक पणती लावूदे;
फार वाटते एकटे
हात हातात राहूदे.

इवल्याशा पणतीने
दूर पळतो अंधार;
लढणा-या माणसाला
देते शुभेच्छा आधार.

कोसळलेल्या शतकाचा कवी : मुकुंद कुळे

एका अर्थाने वसंत आबाजी डहाके पुराणपुरुषच तर 
आहेत. सरलेल्या विसाव्या शतकाचा वेध घेणारे. 
‘योगभ्रष्ट’, ‘शुभवर्तमान’, ‘शुन:शेप’ आणि आता पुरस्कार 
मिळालेला ‘चित्रलिपी..’ या कवितासंग्रहांत त्यांनी 
सरलेल्या शतकांतील घटनांचाच वेध घेतलेला आहे.
काळाचे घाव पचवून, नंतर रिचवून, जो आपल्या 
कलाकृतीतून त्या काळाचंच रूप त्यातल्या जमेच्या 
आणि उणिवेच्या बाजूंसकट ठळकपणे अधोरेखित करतो, 
तो खरा कलावंत. कारण केवळ कल्पनारंजन हे 
कुठल्याही जातिवंत कलेचं बलस्थान असूच शकत नाही. 
या निकषावर ज्येष्ठ कवी वसंत आबाजी डहाके यांची 
कविता घासून पाहिली, तर ती जितकी घासावी तितकी 
अधिक झळाळून उठते. कारण वसंत आबाजी डहाके 
यांची कविता मनोरंजनासाठी किंवा मनोविनोदनासाठी 
कधीच नव्हती. उलट कुसुमाग्रज आपल्या कवितेविषयी 
म्हणायचे त्याप्रमाणे ‘जात्याच रूक्ष या, एकच त्या 
आकांक्षा; तव आंतर अग्नी क्षणभर तरी फुलवावा’ या 
थाटाच्याच डहाकेंच्या कविता होत्या आणि आहेत. मग 
ती कविता त्यांच्या पहिल्या ‘योगभ्रष्ट’ कवितासंग्रहातली 
असो किंवा नुकताच त्यांच्या ज्या कवितासंग्रहाला 
साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला त्या ‘चित्रलिपी’ 
संग्रहातली कविता असो; ती वाचून वाचणारा अस्वस्थ, 
सैरभैर होतो. इतका त्यांच्या कवितेतला अनुभव थेट, 
पण दाहक असतो. अर्थात, आपल्याला छळणारा अनुभव 
ते आक्रमक, बोच-या  किंवा तिरक्या शैलीत कधीच 
मांडत नाहीत. उलट मनात जे खदखदतंय ते शांतपणे 
मित्राच्या खांद्यावर हात ठेवून विश्वासाने त्याला काही 
सांगावं, तशी ते कविता लिहितात. ही विश्वासार्हता किंवा 
शांतपणा हाच वसंत आबाजी डहाके यांचा स्थायीभाव 
आहे. जे वसंत आबाजी डहाके यांना ओळखतात, किंवा 
जे त्यांना भेटलेत, त्यांना हे नक्की पटेल. कारण वसंत 
आबाजी डहाकेंना कधीही भेटलात आणि कोणताही प्रसंग 
असला, तरी त्यांची बोलण्याची संथ आणि शांत लय 
कधीही बिघडत नाही. एखाद्या व्रतस्थ योग्यासारखेच 
तपस्वी भाव त्यांच्या चेह-यावर असतात. 
पुराणपुरुषासारखे. खूप काही पाहिलंय, सोसलंय हे 
सांगणारे...आणि एका अर्थाने वसंत आबाजी डहाके 
पुराणपुरुषच तर आहेत. सरलेल्या विसाव्या शतकाचा वेध 
घेणारे. ‘योगभ्रष्ट’, ‘शुभवर्तमान’, ‘शुन:शेप’ आणि आता 
पुरस्कार मिळालेला ‘चित्रलिपी..’ या सर्व कवितासंग्रहांत 
त्यांनी सरलेल्या शतकांतील घटनांचाच वेध घेतलेला 
आहे. मात्र त्यांनी इतिहासजमा झालेल्या विसाव्या 
शतकासाठी ‘सरलेलं शतक’ ऐवजी हेतुपुरस्सर 
‘कोसळणारे शतक’ असाच शब्दप्रयोग केला आहे. कारण 
त्यांच्या दृष्टीने विसाव्या शतकात सामाजिक, राजकीय, 
सांस्कृतिक, धार्मिक अशा सर्वच क्षेत्रांत घडलेल्या 
महत्त्वाच्या घटना या उन्नतीऐवजी विश्वाला एकप्रकारे 
अधोगतीकडेच नेणा-या होत्या आणि या सरलेल्या 
शतकावर त्यांनी आपल्या प्रत्येक संग्रहातून किंबहुना 
प्रत्येक कवितेतून यथोचित भाष्य केले आहे. आपल्या 
कवितेच्या माध्यमातून त्यांनी समाजातील विविध 
वृत्ती-प्रवृत्तींवर केलेलं भाष्य किती मोलाचं होतं, हेच जणू 
त्यांना मिळालेल्या साहित्य अकादमीच्या पुरस्कारामुळे 
सिद्ध झालं आहे. वास्तविक वसंत आबाजी डहाके गेली 
चाळीस वर्ष प्रचंड ताकदीची कविता लिहीत आहेत. 
त्यामुळे साहित्य अकादमीसारखा मानाचा पुरस्कार 
त्यांना मिळायला अंमळ उशीरच झाला. पण पुरस्काराचा 
सोस बाळगणा-यांतले डहाके नाहीत. म्हणूनच गेल्या 
तब्बल चाळीस वर्षांत ‘योगभ्रष्ट’, ‘शुभवर्तमान’, 
‘शुन:शेप’ आणि ‘चित्रलिपी’ असे त्यांचे फक्त चारच 
कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. कुणाकडे काही 
मागायला जावं किंवा कुणाकडे आपल्यासाठी शब्द 
टाकावा, ही डहाकेंची आणि त्यांच्या कवितेची प्रवृत्तीच 
नाही. त्यामुळे त्यांचं आजवर खूप नुकसानही झालं आहे. 
पण त्याविषयी त्यांची काही तक्रारही नाही. किंबहुना 
म्हणूनच आपण कोसळणा-या  शतकाचं गीत गायला 
मोकळे आहोत, असं ते आजही अभिमानाने सांगतात. 


वसंत आबाजी डहाकेंची पहिली दीर्घकविता ‘योगभ्रष्ट’ ही 
१९६६च्या ‘सत्यकथा’च्या मेच्या अंकात प्रसिद्ध झाली 
होती. त्यानंतर ते जणू ‘सत्यकथा’ आणि पर्यायाने 
‘मौज’चेच कवी होऊन गेले. पण मौजेचा शिक्का 
बसल्यामुळेच, १९६०च्या आसपास उदयाला आलेल्या लघु 
अनियतकालिकांच्या चळवळीतील कवींनी आणि त्यांना 
उचलून धरणा-या  समीक्षकांनी वसंत आबाजी डहाकेंच्या 
कवितेकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले. वास्तविक डहाके 
यांची कविता पहिल्यापासून लघु अनियतकालिकांत 
प्रसिद्ध होणा-या कवितेशीच नातं सांगणारी होती. 
किंबहुना त्यापेक्षा सरसच होती. पण केवळ त्यांच्या 
कविता मौजेत प्रसिद्ध झाल्यामुळे लघु 
अनियतकालिकांतील तत्कालीन कविमंडळाने डहाकेंची 
कविता अलक्षितच ठेवली. परंतु जे अस्सल असतं, ते 
कधीच काळवंडत नाही. त्यानुसारच नव्वदोत्तरीत उदयाला 
आलेल्या कवींच्या पिढीने वसंत आबाजी डहाके यांनाच 
आपला  आदर्श मानला. यासाठी डहाके स्वत: कधीच 
कुणाला काही सांगायला गेले नाहीत. पण वाट पुसत 
आलेल्या कुणाला त्यांनी माघारीही पाठवलं नाही. 
त्यामुळेच आजची कवींची तरुणपिढी वसंत आबाजी 
डहाके आणि त्यांच्या कवितेवर भरभरून प्रेम करते आहे. 
चंद्रपूर, अमरावती, मुंबई आणि आता आयुष्याच्या 
उत्तरार्धात वसंत आबाजी डहाके व प्रभा गणोरकर या 
जोडप्याने पुन्हा एकदा आपल्या गावी म्हणजे 
अमरावतीला तळ ठोकला आहे. आयुष्याच्या सुरुवातीला 
काही स्थलांतरं डहाकेंना नाईलाजास्तव परिस्थितीअभावी 
करावी लागली. या प्रत्येक स्थलांतराची हुरहूर त्यांच्या 
कवितांमधून अधेमधे भेटीला येत राहिली. मात्र पुन्हा 
अमरावतीला परतण्याचा निर्णय हा त्यांचा आणि 
प्रभाताईंचा दोघांचा होता. मात्र डहाके अमरावतीला गेले 
म्हणून स्वस्थ बसले असं झालं नाही. उलट 
अमरावतीसारख्या छोट्या शहरात वसूनही संपूर्ण महाराष्ट्र 
हेच त्यांचं मोठं घर झालं आहे. कारण वास्तव्य कुठे 
आहे, हे त्यांच्या लेखी कधीच महत्त्वाचं नव्हतं. उलट 
कुठेही राहिलो, कुठल्याही समाजवास्तवात राहिलो, तरी 
समाजात घडणा-या  घटनांची स्पंदनं टिपणारं मन तेवढं 
जागृत असलं पाहिजे, एवढीच त्यांची प्रत्येक वेळी 
माफक इच्छा असायची. आणि तसं त्यांचं मन जागरूक, 
संवेदनशील राहिलं; त्यामुळेच तर ते कोसळत्या शतकाचे 
साक्षीदार होऊन लिहू शकले-मी जेव्हा मागं वळून 
पाहतोया मावळत चाललेल्या शतकाकडे.तेव्हा 
बाजारबुणग्या लोकांचे दंगे पचवूनसुस्त पडलेल्या 
राजवटींची वेटोळी दिसतात;विध्वंसाची एकसारखी पिकं 
काढून नापीक केलेली पृथ्वी दिसते..

(‘प्रहार’वरून साभार) 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

|| एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर जन्म घेणा-या तान्ह्या मुला ||

`डॉ.श्रीकृष्ण राऊत यांच्या मराठी कविता’ या ब्लॉगवर वाचा : महाराष्ट्रातील प्रतिष्ठेचे अनेक पुरस्कार प्राप्त दीर्घ कविता : ‘एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर जन्म घेणा-या तान्ह्या मुला’ दीर्घ कविता येथे वाचा
गझलकार