वसंत आबाजी डहाके यांच्या ‘चित्रलिपी’ या कवितासंग्रहाला
साहित्य अकादमीचा पुरस्कार घोषित झाला.त्याबद्दल
डहाके सरांचे मन:पूर्वक अभिनंदन.
या निमित्ताने सरांवरील दोन लेख आणि
सरांची एक कविता येथे देत आहोत.
________________________________________________
अनुबंध-युगमानसाचा कवी : प्रा. वसंत डहाके
कवितेच्या क्षेत्रात नव्या पाऊलखुणा उमटविण्यात डहाके यांच्या कवितेने महत्त्वपूर्ण वाटा उचललेला आहे. त्यांच्या जाणिवेचा अवकाश अत्यंत व्यापक आहे. गतिमान प्रवाहाला कवेत घेण्याचे सामर्थ्य त्यांच्या भाषाशैलीत आहेत.आत्मभान आणि समाजभान यांचा समतोल त्यांच्या व्यक्तिमत्त्वात असल्यामुळे त्यांच्यातील सर्जनशील प्रतिभेचा आणि त्यांच्या समीक्षा विचारातील प्रज्ञेचा कुठेही विसंवाद आढळत नाही...
कोसळत्या शतकाचा कवी
१९७० नंतरच्या समकालीन समाजवास्तवावर भाष्य करणारी कविता लिहिणारे प्रभावी कवी, कादंबरीकार, समीक्षक आणि विचारवंत म्हणून वसंत आबाजी डहाके यांनी मराठी साहित्यविश्वावर तेजस्वी मुद्रा उमटविली आहे. पूर्वसुरींचा व्यासंग, आधुनिक मराठी वाङ्मयाचे प्रगल्भ आकलन आणि पृथगात्म चिंतनशील भाष्य हे त्यांच्या समीक्षात्मक लेखनाचे गुणवैशिष्ट्य आहे. स्वातंत्र्योत्तर कालखंडात भारतीय प्रजासत्ताकाची नव्याने उभारणी झाली. निराळे राजकीय आणि सांस्कृतिक वास्तव अस्तित्वात आले. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मृत्यूनंतर देश संकटग्रस्ततेच्या संक्रमणावस्थेतून गेला. डहाके यांची पिढी फसवणुकीच्या, भ्रमनिरासाच्या आणि आदर्शवादाच्या हळूहळू झालेल्या विनाशाच्या काळात स्तब्ध झाली. अस्वस्थ झाली. एकीकडे हा कमालीचा अंधार आणि दुसरीकडे मानसिक क्षितिज रुंदावतानाही या पिढीने अनुभवले. मार्टिन ल्युथर किंग, चे गेव्हारा, रेजिस डेब्रे आणि इल्विस प्रीस्ले हे विश्वाच्या कानाकोपऱ्यातील मोहरे विचारधनाच्या संदर्भात वसंत आबाजी डहाके यांना अनुभवता आले. राजकीय, सामाजिक वाङ्मयीन आणि सांस्कृतिक पर्यावरणाची उभारी डहाके यांच्या प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्त्वाला प्रेरणा देऊन गेली. विसावे शतक हे सर्वार्थाने वादळी शतक होते. विशेषतः त्याचा उत्तरार्ध जीवनमूल्यांच्या ऱ्हासाचा ठरला. या दुखऱ्या वास्तवाचे ते साक्षीदार ठरले. प्रख्यात समीक्षक डॉ. विजया राजाध्यक्ष यांनी वसंत आबाजी डहाके यांचा 'कोसळत्या शतकाचा कवी' असा उल्लेख केलेला आहे, तो अर्थपूर्ण आहे.
बेलो-यातून सुरू झाला प्रवास
वसंत आबाजी डहाके हे त्यांचे संपूर्ण नाव. याच नावाने त्यांनी आपले लेखन केले. त्यांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील बेलोऱ्यास ३० मार्च १९४२ ला झाला. त्यांचे वडील त्या गावचे पाटील होते. बेलोऱ्यास त्यांचे घर आणि शेती होती. डहाके दहा वर्षांचे होईपर्यंत बेलो-यास राहिले. त्यांचे प्राथमिक शिक्षण बेलोऱ्यास झाले. माध्यमिक शिक्षणासाठी ते चंद्रपूरला गेले. पाचवीपासून बी.ए. पर्यंत ते चंद्रपूरला राहिले. डहाके यांच्या आईचे माहेर चंद्रपूर जिल्ह्यातले. चंद्रपूरच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये त्यांचे माध्यमिक शिक्षण झाले. १९५८ मध्ये ते एस. एस. सी.ची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्याच वर्षी चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे जनता कॉलेज निघाले. गावातच कॉलेज निघाल्यामुळे त्यांनी तेथेच प्रवेश घेतला. वणीचे देवराज गोहोकर या कॉलेजचे प्राचार्य होते. त्यानंतर गोरखनाथ महाजन हे प्राचार्य झाले. प्रा. भाऊ मांडवकर हे त्यांचे मराठीचे प्राध्यापक होते. ते सर्जनशील लेखक होते. त्यांनी त्यांना उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले. याच काळात डहाके यांना कविता करण्याचा छंद जडला. याबाबतीतही प्रा. मांडवकरांनी त्यांना प्रोत्साहन दिले. कृष्णा चौधरी आणि वर्गमित्र पुरुषोत्तम वनकर यांना कवितेची गोडी होती. त्यांच्या सहवासात डहाके यांची कविता बहरत गेली. बी.ए.च्या पहिल्या वर्षांत असताना त्यांची 'एक आगळा पक्षी' ही कविता 'सत्यकथा' मासिकात प्रसिद्ध झाली. पुढे सुरेश द्वादशीवार यांच्यासारखा संवेदनशील आणि धडपड्या स्वभावाचा मित्र त्यांना लाभला.
लोकसंचिताचे कवितेतून प्रतिबिंब
शालेय वयापासूनच त्यांना वाचनाची गोडी लागली. चंद्रपूरच्या शाळेत असताना एका मित्राने त्यांना बाबूराव अर्नाळकरांची पुस्तके आणून दिली. चातुर्मासाच्या दिवसांत त्यांचे वडील 'नवनाथांच्या कथा', 'हरिविजय', 'पांडव प्रताप', 'जैमिनी अश्वमेध' आणि 'शिवलीलामृत' इत्यादी पोथ्या वाचत. याचा सखोल संस्कार डहाके यांच्यावर झाला. 'किर्लोस्कर', 'स्त्री' आणि 'मनोहर' ही मासिके त्यांच्या वाचनात येत असत. 'सत्यकथा' मासिक आणि 'मौज' साप्ताहिक त्यांच्या हाती आले. श्री. ना. पेंडसे आणि गो. नी. दांडेकर यांच्या कादंबऱ्या त्यांच्या वाचनात आल्या. बी.ए.च्या शेवटच्या वर्षांपर्यंत कुसुमाग्रज, बा.भ. बोरकर, पु. शि. रेगे, अनिल, शरच्चंद्र मुक्तिबोध, बा.सी. मर्ढेकर आणि इंदिरा संत इत्यादी कवींचे कवितासंग्रह त्यांनी वाचले. १९६० दरम्यानचा काळ हा त्यांच्या ऐन तारुण्याचा काळ. नवसाहित्याच्या ऐन बहराचा हा काळ होता. एकीकडे हा असीम आशावादाचा कालखंड होता. आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील नव्या आशा- आकांक्षांचा, नव्या स्वप्नांचा हा कालखंड होता. दुसरीकडे राष्ट्रीय जीवनातील स्वप्नभंगाचेही ते दिवस होते. या परस्परविरोधी प्रवाहांचे हेलकावे त्यांच्या संवेदनशील मनामध्ये निर्माण होत होते. त्यातून त्यांची कवी म्हणून संवेदनशीलता घडत गेली. ज्या चंद्रपूरच्या परिसरात डहाके वाढले तो विदर्भ - महाराष्ट्राचा अतिपूर्वेकडील भाग होता. त्या प्रदेशाला प्राचीन परंपरा लाभलेली होती. आंध्र प्रदेशाच्या सीमा या परिसराला भिडलेल्या होत्या. कमी पावसाचा हा प्रदेश पण समृद्ध संस्कृतीचे हे माहेरघर होते. सातवाहनांचे आणि वाकाटकांचे येथे एकेकाळी साम्राज्य होते. बौद्धधर्माचा प्रभाव होता. हा सारा इतिहास, भाषा, लोकसंचित आणि निसर्ग डहाके यांच्या कवितेतील प्रतिमाविश्वातून प्रतिबिंबित झालेला आहे. कोरड्या आणि जाळणाऱ्या उन्हाळ्याची रूपके, खडकांची न संपणाऱ्या रस्त्यांची आणि मृगजळाची रूपके त्यांच्या कवितेत अवतरलेली आहेत. संतपरंपरेचा प्रभाव त्यांच्यावर पडलेला होता.
कवितेत जन्मली नवी प्रतिमासृष्टी
मराठी कवितेच्या क्षेत्रात नव्या पाऊलखुणा उमटविण्यात डहाके यांच्या कवितेने महत्त्वपूर्ण वाटा उचललेला आहे. त्यांच्या जाणिवेचा अवकाश अत्यंत व्यापक. जागतिक महत्त्वाच्या घटनांचे, समकालीन विचारप्रवाहांचे आणि वाङ्मयप्रकारात घडलेल्या नव्या परिवर्तनांचे संस्कार त्यांनी मनात मुरवून घेतलेले आहेत. तिसऱ्या संभाव्य महायुद्धाची पडलेली छाया, देश-परदेशातील महनीयांचे मृत्यू, स्वातंत्र्यासाठी झालेला संघर्ष आणि त्यात झालेली जीवितहानी, विद्यार्थी आंदोलने, मूलतत्त्ववादी विचारप्रणालीचा वाढता प्रभाव आणि मार्क्सवादी विचारसरणीचा अस्त यामुळे जग ढवळून निघाले होते. या साऱ्या मंथनप्रक्रियेतून डहाके यांची कविता नवी प्रतिमासृष्टी घेऊन जन्मास येत होती. समकालीन कवींच्या समानधर्मेपणाशी ती संवाद साधीत होती. आयुष्यामध्ये वेगवेगळ्या कारणांसाठी केलेली स्थलांतरे त्यांच्या अनुभवविश्वात नवी भर टाकत होती. त्यांच्या चित्रातील अस्वस्थता भावात्मक आणि सर्जनात्मक अनुभूतींना नवी प्रेरणा देत होती. १९६६ मध्ये मेच्या अंकात त्यांची प्रदीर्घ "योगभ्रष्ट' ही कविता प्रसिद्ध झाली. नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने
अमरावती, हिंगणघाट पुन्हा अमरावती अशी त्यांची भ्रमंती चाललेली होती.
योगभ्रष्ट
'योगभ्रष्ट' हा त्यांचा पहिला कवितासंग्रह १९७२ मध्ये प्रसिद्ध झाला. त्यातील सर्व कविता १९६६ ते १९७१ या काळातील आहेत. त्यांच्या कवितांतून आणि रेखाटलेल्या चित्रांमधून त्यांच्या अंतर्मनातील तीव्र तडफड, अस्वस्थता आणि उद्रेक अत्यंत पारदर्शी शब्दांत प्रकट झालेला आहे. समांतरपणे मनातील भावकोमल मृदू स्वर या कवितेत मुखर झाले आहेत. प्रेमविषयक अनुभूती त्यांनी उत्कटतेने व्यक्त केली आहे. समकालीन समाजवास्तवाचा सारा दाह आणि व्यक्तिमनातील प्रक्षोभ, उद्वेग त्यांच्या 'योगभ्रष्ट' या संग्रहातील कवितेतून व्यक्त होतो.
अंतर्मुख करणारा कवितेचा भावनाशय
१९७० मध्ये त्यांचा 'शुभवर्तमान' हा दुसरा कवितासंग्रह प्रसिद्ध झाला. १९७५ च्या आणीबाणीनंतर देशातील स्थितीत आमूलाग्र बदल जाणवायला लागला. बौद्धिक क्षेत्रात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले. विचारांचे, भावभावनांचे आणि संवेदनांचे बराकीकरण करण्याची प्रक्रिया राज्यकर्त्यांकडून घडली. या सामाजिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात निर्माण झालेला थरकाप, किंकर्तव्यमूढता आणि अस्तित्वशून्यता यांचे विदारक चित्रण 'शुभवर्तमान'मधील 'नखे', 'नटासाठी पार्श्वसूचना', 'मोर्चा', 'क्रांती', 'मीठ महाग झालं की उंदीर मारण्याचं औषध', 'विचार झाला पाहिजे', 'अमानुष सत्तेचे दिवस', 'वृत्तपत्र' व 'वाचकांचा पत्रव्यवहार' या कवितांमधून डहाके यांनी केलेले आहे. सामाजिक संवेदनशीलतेचे उत्कट आणि प्रगल्भ रूप 'शुभवर्तमान'मधील कवितांमधून आढळून येते.
'शुनःशेप'मध्ये या जीवनचिंतनाला वेगळी मिती प्राप्त झालेली आहे. देशातील राजकीय परिस्थितीवरील आणि प्रवृत्तींवरील भाष्य करणाऱ्या कवितांचा समावेश या संग्रहात झालेला आहे. 'पोट', 'यायचे ते आलेच नाहीत', 'मुलं हसताहेत', 'नकार', 'प्रेत', 'शब्द प्रभूचं स्वागत' आणि 'परिस्थिती' या 'शुनःशेप'मधील कविता लक्षणीय आहेत. 'अदृष्टाचं काव्यशास्त्र', 'अस्वस्थचित्र हस्ताक्षर', 'काळे कागद', 'अस्वस्थ रस्त्यांवरून' आणि 'देव' या कवितेतेली भावनाशय अंतर्मुख करणारा आहे.
दाहक वास्तवाची 'चित्रलिपी'
'चित्रलिपी' या कवितासंग्रहामध्ये माणसाचे एकाकीपण, किता आणि निराशा यांचे दर्शन घडते. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात सामूहिक दुःखाचे स्वरूप अनुभवाया मिळाले. एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकातही या देशातील राजकीय, धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात जी पडझड झालेली आहे त्याचे भीषण चित्र त्यांनी रेखाटले आहे. 'वर्तमानाविषयी काही विचार', 'शतक', 'सुगी', 'कार्यकर्ते', 'दाद', 'उमेदवार निवडीची बैठक', 'महानगर', 'प्रश्न', 'कोंडवाडा', 'पुतळे', 'वाट' आणि 'कीा नाहीचं गाणं' या कवितांमधून दाहक वास्तवाविषयीची डहाके यांची प्रगल्भ जाणीव व्यक्त होते.
अधोलोक
कवितेबरोबरच वसंत आबाजी डहाके यांनी कादंबरी लेखन केलेले आहे. 'अधोलोक' ही त्यांची पहिली कादंबरी १९७५ मध्ये प्रसिद्ध झाली. ती एक गंभीर शोकात्मिका आहे. भीती, अपराध, लाचारी, क्षुधा, व्यक्तित्वहीनता आणि असंबद्धता आणि या सगळ्यांवर आपले वर्चस्व गाजविणारी विराट सत्ता आणि तिच्या टाचेखाली चिरडून पराभूत झालेल्या एका माणसाची कथा या कादंबरीत गुंफली आहे. सत्तेपुढे माणूस कसा हतबल होतो. सर्वंकष विनाशाच्या गर्तेत कसा फेकला जातो, याचे विदारक दर्शन या कादंबरीतून घडते. विविध पातळ्यांवर फिरणारा हा अनुभव वसंत आबाजी डहाके वास्तव आणि कल्पनीय यांची कलात्म गुंफण करून मांडलेला आहे. मानवी जीवनातील मूलभूत समस्यांचा हा शोध आहे. डहाके यांच्या प्रतिभेतील काव्यात्मकतेचा धर्म येथे प्रकट झालेला आहे.
नातेसंबंध ते आत्मकेंद्री
'प्रतिबद्ध' आणि 'मर्त्य' या वसंत आबाजी डहाके यांच्या लघुकादंबऱ्या आहेत. या दोहोंच्या कथानकात काही समान दुवे आहेत. अंतःसूत्र जाणवते. विसाव्या शतकातील प्रमाथी सत्ताकेंद्रामुळे व्यक्तिजीवनाची होणारी होरपळ 'प्रतिबद्ध'मध्ये चित्रित केलेली आहे. शहरामध्ये होत गेलेल्या परिवर्तनाचा वेध येथे प्रभावीपणे घेण्यात आलेला आहे. कालपर्यंत कौटुंबिक नातेसंबंधांना जपणारी माणसे आज कशी आत्मकेंद्रित झाली, असा प्रश्न इथे उपस्थित केला आहे. एका प्रश्नातून अनेक प्रश्न निर्माण होतात. प्रश्नोपनिषद निर्माण होते.
'मर्त्य'मध्ये आत्मशोधाची प्रक्रिया
'मर्त्य'मध्येही अंतर्मुखता आहे. माणसाचे कीटकासारखे जीवन येथे रंगविले आहे. एफिमेरॉनचे आयुष्य एक दिवसाचे. माणसाचे शंभर वर्षांचे म्हणजे त्याचा तो एक दिवसच. या प्रतीकात्मकतेतून वसंत आबाजी डहाके खूप काही सुचवून जातात. या जीवनात जन्म, मोठे होणे, जगण्यासाठी धडपड, संसार, अन्न शोधणे, बायकामुले, माया करणे, रडणंभेकणे, भांडणे, लढणे, अस्तित्व पणाला लावणे, महत्त्वाकांक्षा, वासना, इच्छा, कामक्रोधमोहमदमत्सर, जळणं, जाळणं, मुलांचे संसार, नातवंडांची तोंडे पाहणे, विचार करणे, कविता लिहिणे, नाटके बसविणे अकर्मण्य असणे आणि मरून जाणे. या कादंबरीत आत्मशोधाची प्रक्रिया आहे. समकालीन जीवनशैलीवरील हे जळजळीत भाष्य आहे. या दोन्ही लघुकादंबऱ्यांमध्ये प्रयोगशीलता आहे. कवितेसारखी मिताक्षरी रचना आहे. जीवनातील गतिमान प्रवाहाला कवेत घेण्याचे सामर्थ्य डहाके यांच्या भाषाशैलीत आहेत. मुखपृष्ठावरील, मलपृष्ठावरील आणि अंतर्भागात काढलेली मोजकीच रेखाचित्रे आशयसूत्रांना पुष्टी देतात.
कवी असण्याचे आत्मभान
वसंत आबाजी डहाके हे स्वतः कवी. कवी असण्याचे आत्मभान त्यांच्या व्यक्तिमत्त्वात पुरेपूर आहे, शिवाय सर्जनशील साहित्यिक म्हणून जगत असताना समकालीन समाजवास्तव, राजकीय परिस्थिती, शिक्षणविश्व, वाङ्मयीन संस्कृती आणि समग्र सांस्कृतिक पर्यावरण याविषयीचे प्रगल्भ समाजभान त्यांना आहे. आत्मभान आणि समाजभान यांचा समतोल त्यांच्या व्यक्तिमत्त्वात असल्यामुळे त्यांच्यातील सर्जनशील प्रतिभेचा आणि त्यांच्या समीक्षा विचारातील प्रज्ञेचा कुठेही विसंवाद आढळत नाही. ते अव्वल दर्जाचे समीक्षक आहेत. "कवितेविषयी' या ग्रंथात त्यांनी सैद्धांतिकच आणि उपयोजित स्वरूपाची समीक्षा लिहिली आहे. त्यात जुन्या-नव्या कवींच्या काव्याचा परामर्श घेतलेला आहे.
मराठी साहित्य : इतिहास आणि संस्कृती हा त्यांचा महत्त्वपूर्ण समीक्षाग्रंथ. मराठी साहित्यसृष्टीच्या प्रारंभापासून आतापर्यंतच्या प्रवाहांचे आणि अंतःप्रवाहांचे, वृत्तीप्रवृती विहंगमावलोकन या ग्रंथात आहे. मराठी माणसाचे जीवनसंचित, त्याची जीवनशैली आणि त्याने केलेली साहित्यनिर्मिती यांमधील अनुबंधाचा मर्मदृष्टीने घेतलेला हा शोध आहे.
वसंत आबाजी डहाके हे मराठी साहित्यातील एक मानदंड आहेत.
- डॉ. सोमनाथ कोमरपंत
(दैनिक 'गोमंतक'मधून साभार)
वसंत आबाजी डहाके
वसंत आबाजी डहाके हे नाव मराठी वाङ्मयात सर्वतोमुखी झाले ते १९६६ साली 'सत्यकथे'च्या मे महिन्याच्या अंकात प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या 'योगभ्रष्ट' या दीर्घ कवितेमुळे. अत्यंत वेगळ्या प्रतिमा वापरून विधानात्मक शैलीत लिहिलेली ही कविता त्या काळातल्या तरुणाचं नैराश्य, दारुण स्वप्नभंग, वर्तमानाने केलेली कोंडी, त्याची परात्मता, पराभूतता या सर्वांना विलक्षण शब्दरूप देऊन गेली. डहाकेंची कविता उत्तरोत्तर आशयाच्या खोल डोहात उतरत गेली, हे 'योगभ्रष्ट', 'शुभ वर्तमान', 'शुन:शेप', 'चित्रलिपी' या त्यांच्या काव्यसंग्रहातून सर्वांनी प्रचीती घेतली. त्यांनी 'अधोलोक आणि र्मत्य' यासारख्या कादंबऱ्यांतून, 'सर्वत्र पसरलेली मुळं'सारख्या दीर्घ कवितेतून अस्तित्ववादी जाणिवेचा विराट प्रत्यय दिला. एकीकडे साहित्यात आपली अशी एक सलग ओळ लिहीत जाणाऱ्या या कवीने दुसरीकडे समीक्षेत आणि कोश वाङ्मयात केलेली कामगिरीही अशीच थक्क करणारी आहे. 'साहित्य आणि संस्कृती' हा ग्रंथ त्यांच्या प्रगल्भतेची खूणच आहे. मराठी साहित्यात कोशकारांची संख्या मुळातच कमी होती. अशा कामासाठी लागणारा व्यासंग आणि बृहदृष्टी असलेली माणसे दुमीर्ळ झाली आहेत. अशा काळात डहाकेसरांनी संक्षिप्त मराठी वाङ्मय कोश, वाङ्मयीन संज्ञा आणि संकल्पना कोश, शालेय मराठी शब्दकोश संपादित करून भाषेसाठी मोठेच काम करून ठेवले आहे. उत्सवी समारंभांपासून दूर राहून, प्रसिद्धीच्या झोतांपासून स्वत:ला वाचवत डहाके शांतपणे संदर्भ जमविणे, त्यांची यथार्थता ताडून पाहणे, वाचन-मनन करणे, भटकणे, नोंदी करणे, इतरांनी केलेल्या नोंदी अधिक अचूक होण्यासाठी त्यांवर काम करणे, अशा कामात व्यग्र राहत असतात. डहाकेसरांबरोबर काम करणे हा एक समृद्ध अनुभव असतो, यावर प्रकल्पांसाठी त्यांचे सहायक म्हणून काम करणाऱ्यांचे एकमत आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्वही त्यांच्या शब्दांप्रमाणेच अनाक्रमक परंतु ठाम आहे. कोणत्याही विचारसरणीच्या दावणीला स्वत:ला बांधून घेणे त्यांनी नाकारलेले आहे त्यामुळेच ते मौज परिवार आणि लोकवाङ्मय गृह या दोन्ही ठिकाणी सारख्याच सहजपणे आणि विश्वासाने वावरतात. अलीकडे त्यांनी 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या छायाचित्रात्मक चरित्रग्रंथासाठी केलेले काम महत्त्वाचे ठरले आहे. गोदावरी नदीसंबंधी त्यांचे मौलिक काम सुरू आहे. साहित्य आणि संस्कृती यांचा अन्योन्य संबंध शोधत माणसाच्या जडणघडणीच्या इतिहासाचा ताळेबंद ते मांडत आहेत. विदर्भ साहित्य संघाने त्यांच्या या सा-या कर्तृत्वाचा त्यांना 'जीवनव्रती पुरस्कार' देऊन उचित गौरव केला आहे.
(म.टा. वरून साभार)
ससेहोलपट
स्वप्नांवर काठ्या पडतात
तेव्हा मी उठतो झोपेतून
चेह-यावरचे ओंगळ शब्द पुसत.
तर अशी ही चिरफाळलेली सकाळ
आणि त्याआधीची कटाची रात्र
आणि त्याहीआधीचा फितूर दिवस.
पाहतात मख्ख डोळ्यांनी
माझी सर्वांगीण ससेहोलपट.
- वसंत आबाजी डहाके
(`योगभ्रष्ट'मधून)
डहाकेंच्या कवितांचे
इंग्रजी अनुवाद येथे वाचा.
२.
डहाकेंच्या
‘अमिताभ बच्चन’
या प्रसिद्ध कवितेचा अनुवाद
येथे वाचा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा