शुभेच्छा : दिवाळी २०११

शुभेच्छा : दिवाळी २०११

तमा नाही अंधाराची
एक पणती लावूदे;
फार वाटते एकटे
हात हातात राहूदे.

इवल्याशा पणतीने
दूर पळतो अंधार;
लढणा-या माणसाला
देते शुभेच्छा आधार.

कविता आपल्यासाठी ठेवून गेले : विजया राजाध्यक्ष



गेले महिनाभर विंदा आजारी होते. मध्यंतरी हॉस्पिटलमधून ते परत आले तेव्हा त्यांना भेटायला गेले होते. त्यावेळी, पुण्याच्या साहित्य संमेलनात कोणती कविता वाचणार, असे विचारताच, त्यांनी 'यंत्रावतार' असे सांगितले. विंदा कविता वाचायला लागले की, त्यांच्यात काही तरी संचारायचे. त्यांना वेगळेच बळ यायचे. त्या कविता ऐकताना अपार आनंद व्हायचा. 


विंदांनी अतिशय कष्टाचे आयुष्य काढले. ते आयुष्य इमानाने जगले. कवितेच्या क्षेत्रात, आकृतीबंधाच्या क्षेत्रात त्यांनी विलक्षण काम केले. त्यांच्या अध्यापन आणि कविता वाचनाने थक्क व्हावे, असेच त्यांचे कर्तृत्व! काव्यात्म जाणीवचे लघुनिबंधही त्यांनी लिहिले. माधव ज्युलियन यांचे त्यांच्यावर संस्कार होते. ते खूप पुढे गेले असले तरी ज्युलियनांना मात्र त्यांनी अखेरपर्यंत मानले. 


विंदांनी अभिजात साहित्यकृतींचा अनुवाद केला. 'अमृतानुभवा'चे अर्वाचिनीकरण करताना तर त्यांनी दीर्घ प्रस्तावना लिहिली. ती प्रस्तावना भारुन टाकते. इंग्रजीचे उत्तम प्राध्यापक असल्याने ते अनुवादही अतिशय नेटका करायचे. नुसते अनुवाद नाही केले तर आवश्यक तेथे सुंदर टीपाही लिहिल्या. 


विंदांशी आपले नाते जुळले, ५०-६० वषेर् हे नाते जुळलेले आहे. कविता वाचकांपर्यंत पोहोचवायच्या या एका भावनेने त्यांनी कुठे कुठे कार्यक्रम केले. कष्ट घेतले. अडचणी सहन केल्या. वाचकांना भेटणे हा त्यांचा आग्रह असायचा. स्वभावाने करारी असलेल्या विंदांनी, जेव्हा सांगण्यासारखे नवे काही नाही, असे लक्षात आल्यावर कविता करणे थांबवले. हे धैर्य, निर्धार फार कमी लोकांकडे असतो. किंबहुना तसे कोणी सापडणेच कठीण आहे. ते तर प्रतिभावंतांचे लक्षण आहे. 


विंदांचे आणि आपले नाते अंतर्यामी जुळलेले होते. त्यांनी काही कवितांची भाषांतरेही केली. 'स्वेदगंगा'पासूनचा प्रवास आपल्याला माहितीच आहे. त्यांच्या काही अप्रकाशित कविताही मी वाचल्या आहेत. त्या प्रकाशित होतील की नाही, ते माहिती नाही. त्यांची मागील भावना मला माहिती नाही. 


इतक्या वेगळ्या प्रकारचे लिखाण करणारे, दैवी प्रतिभाशक्ती प्रसन्न असलेले विंदा, त्यांची कविता आपल्याजवळ ठेवून गेले आहेत. कविता ही त्यांची भावभूमी होती. 'देणाऱ्याने देत जावे... घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे', असे म्हणणाऱ्या विंदांचा, देणे-घेणे हा स्वभावच होता. इतक्या लोकांना त्यांनी हात दिला, कधी आशीर्वादासाठी, कधी आधारासाठी, आनंदासाठी. ते हात आपल्या पाठीवर होते आणि ते सदैव राहतीलच! 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

|| एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर जन्म घेणा-या तान्ह्या मुला ||

`डॉ.श्रीकृष्ण राऊत यांच्या मराठी कविता’ या ब्लॉगवर वाचा : महाराष्ट्रातील प्रतिष्ठेचे अनेक पुरस्कार प्राप्त दीर्घ कविता : ‘एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर जन्म घेणा-या तान्ह्या मुला’ दीर्घ कविता येथे वाचा
गझलकार