शुभेच्छा : दिवाळी २०११

शुभेच्छा : दिवाळी २०११

तमा नाही अंधाराची
एक पणती लावूदे;
फार वाटते एकटे
हात हातात राहूदे.

इवल्याशा पणतीने
दूर पळतो अंधार;
लढणा-या माणसाला
देते शुभेच्छा आधार.

माणूसपण जपणारे कवी : किशोर कदम



विंदांची कविता ही 'रोमॅटीसिझम'चा एक भाग होती. अर्थात, हा 'रोमॅटीसिझम' म्हणजे केवळ प्रेमभावना नव्हे. घटनांचे, सामाजिक पद्धतीचे दर्शन घडवणारा तो रोमँटीसिझम होता. त्याला विंदाचा असा एक वेगळा स्पर्श झालेला होता. त्याचे मुळ माधव ज्युलियनांपासून आलेल्या 'रोमँटीसिझम'मध्ये होते. अर्थात, ज्या ज्या लोकांवर पाश्चात्य साहित्याचा प्रभाव पडला आहे, त्यापैकी विंदा एक होते. दि. पु. चित्रेंची कविता त्या प्रभावामुळे इंग्रजाळलेल्या मराठीत होती. परंतु अरुण कोलटकर आणि विंदावरील प्रभाव वेगळा होता. पाश्चात्य साहित्य पचवून ते त्यांच्या कवितांत मराठीपण घेऊन आले. 


वसंत बापट, मंगेश पाडगावकर आणि विंदाच्या कवितांमधील मुख्य फरक हा विंदांच्या कवितांतील वजनदारपणाचा दिसतो. त्यांनी अॅरिस्टॉटल मराठीत आणला, विल्यम शेक्सपीअरशी सलगी केली. त्या प्रभावाला मराठीच्या इतिहासाची, परंपरेची जोड देऊन आलेली त्यांची कविता वजनदार बनली. बापट आणि पाडगावकर यांची कविता त्यामानाने अधिकतर रोमँटिसिझमच्या जवळ जाणारी वाटते. विंदांच्या कवितेतील सामाजिक भाव, बांधिलपणा चोखंदळ वाचकांच्या निश्चित लक्षात येईल. 


विंदा, ९२ वषेर् जगले. ते तरुण आणि मध्यमवयीन कवी, साहित्यिक यांच्यातील महत्त्वाचा दुवा होते. त्यांच्या उत्साहामुळे नेहमीच त्यांचा आधार वाटायचा. माणसाचे माणूसपण जपणारे ते कवी होते. तरुणांनाही त्यांच्याविषयी पेम वाटायचे. विंदाकडे जायला कोणत्याही तरुण कवीला भीती वाटली नाही. सगळ्याच मोठ्या कवींच्याबाबतीतील हा अनुभव असा असतोच, असे नाही. 


आधुनिक काळावर त्यांचा विश्वास होता. 'यंत्रावतार' ही कविता ते वारंवार सादर करायचे. पुन्हा पुन्हा ती वाचायची. कविता वाचताना त्यांच्यात वेगळीच ऊर्जा जाणवायची. वय, आजारपण हे सगळे त्यात लपून जायचे. कवितेत निरनिराळे प्रयोग करणारे, अॅरिस्टॉटल मराठी आणणारे विंदा बाल कवितातही तितकेच रमायचे. त्यांनी सुंदर बाल कविता लिहिल्या. कवितांचे सगळे फॉर्म त्यांनी यशस्वीपणे हाताळले.


आम्ही 'काव्योत्सव २००१' हा कवितांचा कार्यक्रम केला. त्याला प्रमुख पाहुणे म्हणून विंदाना आमंत्रण द्यायला गेलो. त्यांनीही सहज होकार दिला. दि. पु. चित्रे यांनी 'काव्योत्सवा'वर टीका केली होती. असे काव्योत्सव भरवून कविता मोठी होत नाही, असे ते म्हणाले होते. साधे लिहितो, साधे राहातो तो तितकाच मोठा होता, हे दिपुंना कळले नाही. मात्र विंदानी ते ताडले होते. 


किंग लिअरचा राजा लिअरसारखा अनुवाद विंदासारखेच साहित्य पचवलेली व्यक्ती करु शकते. जे पाश्चात्य साहित्यात वजनदार, कसदार होते, ते ते मराठी वाचकांपर्यंत आणण्याचे व्रत घेऊन विंदांनी अनुवाद केले. 


विंदांच्या कविता वाचनात प्रचंड नाट्यमयता होती. त्यामुळे त्यांचे वाचन 'सुश्राव्य' व्हायचे. त्या कवितेत विस्मयकारक नाट्यमता असायची, प्रत्येक चांगल्या कवितेची ही आवश्यक गुणवत्ताच मानायला हरकत नाही. मराठीतील जड शब्द एकामागोमाग एक ठेवून जे साध्य होत नाही, ते विंदांच्या सहज शब्दांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

|| एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर जन्म घेणा-या तान्ह्या मुला ||

`डॉ.श्रीकृष्ण राऊत यांच्या मराठी कविता’ या ब्लॉगवर वाचा : महाराष्ट्रातील प्रतिष्ठेचे अनेक पुरस्कार प्राप्त दीर्घ कविता : ‘एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर जन्म घेणा-या तान्ह्या मुला’ दीर्घ कविता येथे वाचा
गझलकार